न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ!

नवी दिल्ली : भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. सरन्यायाधीश म्हणून सूर्यकांत यांना १५ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. आणि ते ९ फेब्रुवारी २०२७ रोजी सेवानिवृत्त होतील. यावेळी शपथविधी सोहळ्यात भावनिक क्षणही पाहायला मिळाले. शपथ घेतल्यानंतर लगेचच सूर्यकांत यांनी माजी सरन्यायाधीश बी.आर.गवई यांची गळाभेट घेतली. त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.
हरियाणातील हिसार जिल्ह्यातील एका साध्या, मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ग्रामीण भागातील बेंच नसलेल्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन ते देशाच्या सर्वोच्च न्यायिक पदापर्यंत पोहोचले. त्यांचा हा प्रवास जिद्द आणि ज्ञानाप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आपल्या कार्यकाळात अनेक राष्ट्रीय आणि संवैधानिक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब, पेगॅसस स्पायवेअर चौकशी, आणि राजद्रोह कायदा स्थगित करण्याच्या निर्णयांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
या शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि विविध देशांतील मुख्य न्यायाधीश उपस्थित होते.



