अमित शहांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचे जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलन

नवी दिल्ली प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्ष पुढील वर्षी २६ जानेवारीपर्यंत देशभर प्रचार मोहीम राबवणार आहे. २२ आणि २३ डिसेंबर रोजी काँग्रेस नेते १५० हून अधिक शहरांमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. २४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. २७ डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगावात मोठी रॅली होणार आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी रविवारी सांगितले की, संसदेच्या अधिवेशनात राज्यघटनेवर झालेल्या चर्चेदरम्यान अमित शाह यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांचा अपमान केला आहे. शहा यांच्या वक्तव्यामुळे सर्वजण दुखावले आहेत. आजपर्यंत अमित शहा किंवा पंतप्रधानांनी माफी मागितलेली नाही. काँग्रेस हा मुद्दा प्रजासत्ताक दिनापर्यंत म्हणजेच २६ नेवारीपर्यंत देशभरात मांडणार आहे. काँग्रेस नेते पवन खेडा यांनीही माहिती दिली होती की लोकसभा आणि राज्यसभेतील काँग्रेस खासदार आणि उहउ सदस्य देशभरातील १५० वेगवेगळ्या शहरांमध्ये पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करतील.
▪️भाजपनेही प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी सुरू केली..
काँग्रेसची रणनीती पाहून भाजपनेही विरोधकांना उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाने आपल्या एससी/एसटी आघाडीला विधानसभेच्या सर्व जागांवर काउंटर मोहीम आखण्यास सांगितले आहे. यूपी भाजप एससी/एसटी मोर्चाचे अध्यक्ष रामचंद्र कन्नौजिया यांनी पुष्टी केली की पक्ष तळागाळातील विरोधकांचा पर्दाफाश करण्यासाठी मोहीम सुरू करेल. ते म्हणाले, पक्ष दलितविरोधी घोषणा आणि विरोधी पक्षांच्या आधीच्या सरकारांनी उचललेली पावले अधोरेखित करेल. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकांनंतर लगेचच या प्रचाराला सुरुवात होईल, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, मोर्चाच्या जिल्हा घटकांना दलितबहुल गावांमध्ये जाऊन भाजप सरकारने गेल्या १० वर्षांत सुरू केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यास सांगण्यात आले आहे.
▪️आंबेडकर वादावर शहा काय म्हणाले ?
आंबेडकरांवर दिलेल्या वक्तव्यावर अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते १८ डिसेंबरला म्हणाले होते, संसदेतील चर्चा तथ्य आणि सत्यावर आधारित असली पाहिजे. भाजपच्या सदस्यांनीही तेच केले. काँग्रेस हा आंबेडकरविरोधी, आरक्षणविरोधी, संविधानविरोधी आहे, हे सिद्ध झाल्यावर काँग्रेसने जुनीच रणनीती स्वीकारून विधानांचा विपर्यास सुरू केला.



