कुणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो : राजनाथ सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्थासंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण शिखर परिषदेदरम्यान मोठे वक्तव्य केले आहे. राजनाथ सिंह म्हणाले की, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, फक्त कायमचा हितसंबंध असतो. राजनाथ यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये टॅरिफच्या मुद्द्यावरुन तणाव वाढला आहे. तसेच, भारत-चीन संबंध सुधारत आहेत.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले, स्वदेशी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे. आयएनएस हिमगिरी आणि आयएनएस उदयगिरी यासह दोन नीलगिरी श्रेणीतील युद्धनौका देशात तयार करण्यात आल्या आहेत. स्वावलंबनाच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे. नौदलाने इतर कोणत्याही देशाकडून युद्धनौका खरेदी न करण्याचा संकल्प केला आहे.
राष्ट्रीय हितांशी तडजोड नाही : ५०% अमेरिकन टॅरिफचा संदर्भ देत संरक्षण मंत्री म्हणाले की, सध्या जागतिक स्तरावर व्यापारासाठी युद्धासारखी परिस्थिती आहे. विकसित देश अधिकाधिक संरक्षणवादी होत आहेत, परंतु भारत आपल्या राष्ट्रीय हितांशी तडजोड करणार नाही. अस्थिर भू-राजकारणात आता स्वावलंबन ही एक गरज बनली आहे. बदलत्या भू-राजकारणामुळे हे देखील स्पष्ट झाले आहे की, संरक्षण क्षेत्रात बा अवलंबित्व आता आपल्यासाठी पर्याय नाही.



