पोलिसांच्या त्रासाला कंटाळून लातूरच्या ग्रामीण भागात तरुणाची आत्महत्या
अवैध धंद्यांकडे सोयिस्कर दुर्लक्ष; जनतेत संताप

महाराष्ट्र मिशन/विशेष प्रतिनिधी
लातूर : लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी येथील एका २२ वर्षीय तरुणाने पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. चार वर्षांपूर्वी मित्रांच्या नादी लागून केलेल्या एका चुकीचा शिक्का इमरान खलील बेलुरे याच्या कपाळावर असा बसला की, त्याने थेट मृत्यूला जवळ केले. आत्महत्येपूर्वी इमरानने एक व्हिडिओ बनवून त्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या जाचाचा उल्लेख केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण निलंगा तालुक्यासह लातूर जिल्ह्यात खळबळ माजली. संतप्त ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून आरोपी पोलिसांवर कारवाईची मागणी केली.
एकीकडे पोलिसांचा ससेमिरा आणि दुसरीकडे घरच्यांचे बोलणे अशा दुहेरी कात्रीत इमरान अडकला होता. या सततच्या तणावामुळे तो मानसिकदृष्ट्या खचून गेला होता. पोलिसांचा त्रास जेव्हा असह्य झाला, तेव्हा इमरानने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्याने गळफास घेण्यापूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये त्याने दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख करत, त्यांच्या त्रासामुळेच आपण हे पाऊल उचलत असल्याचे सांगितले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्याने फाशी घेऊन आपले जीवन संपवले.
इमरान खलील बेलुरे चार वर्षांपूर्वी एका दुकानात मुनीम म्हणून कामाला होता. त्यावेळी मित्रांच्या संगतीमुळे त्याने आपल्याच मालकाच्या दुकानात चोरी केली होती. ही चोरी पकडली गेली आणि चोरीचा सर्व मुद्देमालही परत करण्यात आला. मात्र, या एका घटनेने इमरानचे आयुष्य बदलून तणावात रुपांतरित झाले.
तेव्हापासून त्याच्यावर चोराचा शिक्का बसला आणि तिथूनच त्याच्या मानसिक छळाला सुरुवात झाली. कोणतीही चोरी झाली की संशयावरून पोलीस त्याला सारखे पकडून नेत.
परिसरात कुठेही चोरी झाली की पोलीस इमरानला चौकशीसाठी घेऊन जात. रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेली पोलिसांची गाडी त्याला घरातून उचलून रात्रभर फिरवत असे, असा आरोप नातेवाईकांनी केला.
बाहेर पडलो तर पोलीस पकडतील या भीतीने इमरान सारखा तणावात असायचा. त्याचे वडील बांगड्यांचा व्यवसाय करतात. छोटा भाऊ काॅलेज मध्ये शिकतो. त्यालाच काॅल करुन इमरान याने औराद येथे तेरणा नदीच्या काठी असलेल्या झाडीत गळफास घेतला. इमरानच्या या कृतीने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात संतापाची लाट पसरली आहे.
इमरानच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक आणि औराद शहाजनी गावातील नागरिक आक्रमक झाले. जोपर्यंत संबंधित दोषी पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन होत नाही आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि औराद शहाजनी गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले.
या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे सुधाकर बावकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मोठ्या फौजफाट्यासह गावात दाखल झाले. गावात पोलिसांचे १० ते १५ वाहने तैनात करण्यात आली. ज्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याशिवाय नातेवाईक मृतदेह घेण्यास तयार नव्हते, मात्र अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी हस्तक्षेप करत नातेवाईकांना विश्वासात घेतले. तुम्ही लेखी जबाब नोंदवा, आम्ही दोषींवर कठोर कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर नातेवाईकांनी माघार घेतली आणि इमरानचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांच्या कडक बंदोबस्तातच इमरानवर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार या प्रकरणी औराद पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान संबंधित तरुणाच्या परिवाराची रविवारी दि २८ डिसेंबर रविवार रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी भेट घेऊन सांत्वन करून सदर घटना दुर्देवी आहे. सदर घटनेचा तपास निपक्षपातीपणे होईल यात पोलीस आहेत म्हणून कुठलीही हायगय तपासात केली जाणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले .
कारवाईचा देखावा
दरम्यान, पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे यांची बदली लातूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय येथे करण्यात आली. त्यांच्या वाहनावरील चालक तानाजी टेळे यांना निलंबित करण्यात आले. तसेच हेड कॉन्स्टेबल विलास पाटोदकर यांना सद्धा मुख्यालयात बदलण्यात आले. ज्यामुळे आत्महत्या केली तो अधिकारी सोडून वड्याचे तेल वांग्यावर काढले गेले अशी चर्चा पोलीस कर्मचारी करत आहेत.
आत्महत्येपूर्वीचे वक्तव्य
”शहाजानी औराद शहाजनी पीएसआय मुझे बहोत परेशान कर रहा था, लेकीन में क्या बोलु, मेरी अम्मी अब्बा बरदाश्त कर रहे हैं, मेरे को बरदाश्त नहीं हो रहा, इसलिए फाशी लेने जा रहा हूँ, लेकीन क्या बोलु में वो चोरी नहीं करना चाहा रहा था, लेकीन करा हूँ अमजद बेलुरे के बास्ते, लेकीन मेरेको नहीं मालुम था, की एसाबी होगा मेरे साथ, मैं एसा करूंगा इसलिए फाशी लेने जा रहा हूँ, और दुसरा कुछ नहीं, मेरा इतना ही बोलना हैं आराद के पीएसआय रात में बारा बजे एक बजे हमारे अम्मी को बोलता था खाना बनाये क्या, खायें क्या ए लड़का परेशान कर रहा है क्या मैं इसलिए फाशी लेने जा रहा हु, मैं इसके आगे कुछ नहीं बोलना चाहा रहा इनमें पीएसआय की गलती हैं वो ड्रायव्हर हैं एक रोज राउंड में आता था, तानाजी बोलके, वो बहोत प्रेशर देता था”
जिथे कारवाई करायची तिकडे दुर्लक्ष
पूर्वी पासून या पोलीस ठाण्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. गावोगावी अवैध दारू विक्री दिवसाढवळ्या सुरू असल्याने अनेक महिलांचे संसार उध्वस्त झाले आहेत. हमरस्त्यावर अनेक हाॅटेलमध्ये बेकायदेशीर दारु विक्री सुरू असते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अपघाताच्या घटना होत असतात. अनेक लोक बळी पडले आहेत. अशा धंद्यांना आळा घालण्याचे सोडून पोलीस किरकोळ चोरी प्रकरणातील आरोपींवर लक्ष ठेवून असतात. लोकांमध्ये याविषयी रोष होता. त्यामुळेच या युवकाने आत्महत्येसारखे पाऊल उचललेले आहे असे म्हटले जाते आहे.




