राज्यात थंडीची लाट, पुढील पाच दिवस किमान तापमानात घसरण कायम

पुणे : राज्यात थंडीची लाट हळूहळू वाढत असून, गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह पुण्यातही थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील पाच दिवस किमान तापमानात घसरण कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
आज, पुण्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअस नोंदले गेले, त्यामुळे आता पुणेकरांनाही हुडहुडी भरली असून, पुण्यातील तापमान महाबळेश्वरपेक्षाही कमी झालं आहे. तर मुंबईमध्येही हळूहळू आता तापमानात घट होत असून, थंडीसाठी मात्र अजूनही वाट पाहावी लागणार आहे.
सध्या अरबी समुद्रात कोमोरिन क्षेत्राजवळ चक्री वाऱ्याची प्रणाली सुरू असून समुद्रसपाटीपासून ०.९ किमी उंचीवर असलेल्या वाऱ्याच्या स्थितीचा या प्रदेशावर परिणाम होतोय. याशिवाय, केरळजवळील आग्नेय अरबी समुद्रातील वाऱ्याचे नमुनेही हवामानावर परिणाम करत आहेत. देशाच्या अनेक भागांमध्ये किमान तापमानात घट झाली असून, किमान आणि कमाल तापमानात १ ते २°C पर्यंत गेल्याची नोंद काही ठिकाणी झाली आहे.
शेतकरी थंडीच्या लाटेमुळे उत्साहित
थंडीची लाट कधी कमी होईल, याची सगळेच वाट पाहत असले तरी शेतकरी मात्र थंडीच्या लाटेमुळे उल्हासित झाला आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भाजीपाला या पिकांना जेवढी थंडी जास्त पडेल ही रब्बी पीके जोमाने वाढतात. फुटवे करतात, पिकांची प्रत दर्जेदार होते.
गव्हावर तांबेरा, करपा, भुरकट्या रोग येत नाही, तर हरभऱ्यावर मर रोग, अळीचा प्रादुर्भाव होत नाही. एवढेच नाही तर ही थंडी आजून महिनाभर पडली तर रब्बी हंगामातील पिकांवर कुठल्याही रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही. उलट रब्बी हंगाम जोमदार येऊन भरघोस उत्पन्न होईल अशी शेतकऱ्यांतून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
छत्रपती संभाजीनगर : 15°C
कोल्हापूर : 27.4°C
महाबळेश्वर : 20.8°C
मुंबई : 24°C
पुणे : 13.6°C
परभणी : 26.8°C
मालेगाव : 25.2°C
अहमदनगर : 25°C



