राष्ट्रीय

वाराणसी मशीद वादात पाकिस्तानचा हस्तक्षेप; भारतीय मुस्लिम धर्मगुरूंचा सडेतोड टोला

वाराणसी : येथील ‘गंज शहीदान’ मशीद प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय रंग चढू लागला आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी सोशल मीडियावर या विषयावर भाष्य केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले असून, वाराणसीसह देशभरातील राजकीय आणि धार्मिक वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

झरदारी यांनी आपल्या पोस्टमध्ये वाराणसीतील मशीद आणि इतर ऐतिहासिक धार्मिक स्थळांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर भारतातील मुस्लिम धर्मगुरूंनीच तीव्र आक्षेप घेतला आहे. काशीतील मुस्लिम धर्मगुरूंनी स्पष्ट शब्दांत सुनावले की, “हा भारताचा अंतर्गत विषय असून पाकिस्तानने यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पाकिस्तानने आधी स्वतःच्या देशातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे.”

दरम्यान, गंज शहीदान मशिदीचा वाद सध्या न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रियेत अडकला आहे. ही मशीद रेल्वेच्या जमिनीवर असून स्टेशनच्या विकासकामांत अडथळा ठरत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. तर दुसरीकडे, मशीद समितीने हा दावा फेटाळत जुन्या दस्तऐवजांच्या आधारे मशीद शेकडो वर्षे जुनी असल्याचा प्रतिदावा केला आहे. या संवेदनशील प्रकरणाची वाढती चर्चा पाहता वाराणसी पोलीस सतर्क झाले असून, सोशल मीडियावर वातावरण बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page