त्यांना कोर्टाचा निर्णय माहीत असावा; पवारांनी फडणवीसांना लगावला टोला

पंढरपूर : आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार आहे. तो काय आहे हे मी सांगू शकत नाही. बहुतेक तो निर्णय फडणवीस यांना माहिती असावा. त्यामुळे ते मी पुन्हा येईन म्हणत असतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी येथे लगावला. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेऊ नये, यासाठी भाजपच्या अनेक लोकांनी देव पाण्यात ठेवले होते. या नाट्यानंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल झाल्याची टीका भाजपकडून होत होती. मात्र, आता पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट महाविकास आघाडी म्हणून कामाला लागणार आहे, असे पवारांनी जाहीर केले. देशात सर्वात जास्त राज्यांमध्ये बिगर भाजप पक्षांचे सरकार आहे. कर्नाटकातदेखील काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे समजते. त्यामुळे भविष्यात विरोधी पक्षाची एकजूट करून भाजपसमोर सक्षम पर्याय दिला जाईल, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा बारसू रिफायनरीला विरोध असल्याचे स्पष्ट करत स्थानिकांना विचारात घेऊन प्रकल्प उभे राहावेत असे त्यांनी सांगितले.



