नवी दिल्लीमहाराष्ट्रमुंबई

राहुल गांधीनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप कार्यकर्ते झाले आक्रमक; काँग्रेसचं कार्यालय फोडलं, शाही अन् दगडफेक

यावेळी पोलिसांकडून लाठीचार्जही करण्यात आला व जमावाला पांगण्याचा प्रयत्न देखील झाला.

मुंबई प्रतिनिधी : भाजपाच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर हल्ला केला असून तोडफोड करण्यात आली. हा जमाव पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असताना त्यांनी जमावावर लाठीचार्ज केला. “आमचं कार्यालय वाचवण्याच्या प्रयत्नात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या अंगावर हात उगारण्याचा प्रयत्न केला”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने अपमान केल्याचा दावा करत भाजपा कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्यालयावर हल्ला केला. भाजपाच्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते आज प्रेस क्लब येथील काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी सुरुवातील राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर शाहीफेक केली. त्यानंतर तेथील खुर्च्या फेकून देण्यात आल्या. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात दगडेही मारली.

दरम्यान, भाजपाच्या या आक्रमकतेची पोलिसांना माहिती मिळताच मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा काँग्रेस कार्यालयबाहेर तैनात करण्यात आला. या पोलिसांकडून भाजपाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही करण्यात आला. जमावाला पांगण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला.

“अमित शाह यांनी केलेल्या व्यक्तव्याचा खुलासा केला आहे. बाबासाहेबांच्या नावावर इतर लोक राजकारण करत आहेत. कारण बाबासाहेबांना काँग्रेसवाल्यांनी त्रास दिला आहे. बाबासाहेबांचं नाव घेण्याची त्यांची लायकी नाही. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व उत्तुंग होतं. त्यामुळे त्यांच्या नावाने राजकारण करणं योग्य नाही. घटनेचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली. “भाजपाचा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर राग आहे. अमित शाह यांच्या भाषणातून तो राग व्यक्त झाला. त्याविरोधात आम्ही आंदोलन केल्याने या गोष्टी होत आहेत”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

“संविधान वाचवणाऱ्यावर हे लोक आता हल्ला करत आहेत. संविधान मानणाऱ्यांवर हल्ला करत आहेत. आज राहुल गांधींवर संसदेत केला. आता त्यांनी मुंबई कार्यालयात हल्ला केला. हिंमत आहे तर सूचना देऊन यायचं होतं. चोराप्रमाणे का आलात? पोलिसांना माहित होतं”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज माध्यमांना दिली.

संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली इतिहासाच्या निमित्ताने लोकसभा आणि राज्यसभेत सर्व खासदारांची चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अमित शहांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. या आरोपाला अमित शाहांनी प्रत्युत्तरही दिलं. “काँग्रेसने माझ्या राज्यसभेतील विधानांची तोडमोड केली असून चुकीचा अर्थ काढला आहे. मोदींची भाषणेही संपादित करून काँग्रेसने प्रसारित केली आहेत. प्रसारमाध्यमांनी माझी पूर्ण विधाने दाखवावीत”, असे आवाहन शहांनी केले. तर यावरून काँग्रेसने पुन्हा अमित शाहांना लक्ष्य केलं. आज संसदेतही या मुद्द्यावरून बराच गदारोळ झाला. त्याचे पडसाद मुंबईत उमटले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page