
मुंबई : महात्मा ज्योतीबा फुले यांचे महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठे योगदान आहे. सत्यशोधक चळवळ, पुरोगामी चळवळीचा वारसा, त्यांनी घालून दिलेली सामाजिक न्यायाची सांगड आजही अत्यंत महत्वाची आहे. महात्मा ज्योतीबा फुलेंचा विचार पुढे घेऊन जायची गरज आहे व काँग्रेस पक्ष त्याचा विचारातून वाटचाल करत आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
सत्यशोधक चळवळीचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने सपकाळ यांनी पुणे येथील महात्मा फुले वाड्याला भेट देवून अभिवादन केले. यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस भानुदास माळी, नगरसेवक प्रशांत जगताप, माजी आमदार दीप्ती चौधरी, शहर उपाध्यक्षा प्राची दूधाने, अविनाश बागवे, राज अंबिके तसेच काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, महात्मा ज्योतीबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरु करून महिलांना शिक्षणाची दारे उघडून महिला सक्षमीकरणाचे एक महत्वाचे पाऊस उचलेले. या क्रांतीकारी निर्णयाला मात्र मनुवादी विचारांनी तीव्र विरोध करत सावित्रीबाईंना प्रचंड त्रास दिला, त्यांचा छळ केला. मनुवादी विचारांना काँग्रेसचा विरोध यातूनच आहे आणि सावित्रीबाईंना छळणाऱ्या विचारांचे लोक आज सत्तेत आहेत असे सपकाळ म्हणाले.



