राज्यात पुन्हा थंडीचा कडाका

पुणे : राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील शीतलहरी हळूहळू दक्षिणेकडे सरकत असल्याने महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल जाणवत आहेत. राज्यभरातच थंडीचा कडाका वाढला आहे. विशेषत: पहाटे आणि रात्रीच्या सुमारास गारठा अधिक वाढत आहे. दिवसा काही काळ ऊबदारपणा जाणवत असला, तरी एकूणच थंडीचा प्रभाव कमी झालेला नाही.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, डिसेंबरअखेर वा-यांच्या दिशेत बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. याचा थेट परिणाम तापमानावर झाला. रविवारी महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत हवामान कोरडे होते. कोरड्या हवामानासोबतच थंडीचा जोर राज्याच्या अनेक भागांत कायम राहिला. उत्तर भारतात सक्रिय झालेल्या तीव्र थंडीच्या लाटेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. त्यामुळे सकाळी लवकर घराबाहेर पडणारे नागरिक, शेतकरी आणि कामगार वर्गाला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.
दाट धुक्याचा इशारा
हवामान खात्याने उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये एक जानेवारीपर्यंत दाट धुक्याचा इशारा दिला आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील काही भागांत पहाटे धुक्याची चादर पसरलेली दिसून येईल. विशेषत: महामार्गांवर आणि ग्रामीण भागांत वाहनचालकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




