बजरंग दलवर तात्काळ बंदी घाला; मूलनिवासी मुस्लिम मंचाची मागणी

पुणे : उत्तराखंडच्या कोटद्वारमध्ये घडलेली घटना म्हणजे केवळ एका दुकानदारावर झालेला अन्याय नाही, तर ती भारताच्या संविधानावर, लोकशाहीवर आणि धार्मिक स्वातंत्र्यावर झालेली उघड दहशतवादी कारवाई आहे. एका मुस्लिम दुकानदाराने आपल्या दुकानाला “बाबा” असे नाव दिले म्हणून बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी त्याला धमकावणे, दहशत निर्माण करणे आणि नाव बदलण्यासाठी बळजबरी करणे हे कोणत्या कायद्याखाली केले जात आहे? हा प्रश्न आज संपूर्ण देश विचारत आहे, असे मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी म्हटले आहे.
बजरंग दलावर कायमस्वरूपी बंदी घालावी. दुकानदार दीपक कुमार यांच्यावर दाखल खोटी एफआयआर त्वरित मागे घ्यावी, त्यांच्या मुलीवर शाळेत लादलेली बंदी हटवावी, कोटद्वार येथे पत्रकारांवरील बंदी उठवावी.
मागण्यांसाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करून पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी भोला सिंग अरोरा अध्यक्ष गुरुद्वारा गणेश पेठ, राजन नायर ईसाई महासंघ, सगई नायर, भीम आर्मी संघटनाचे प्रदेश नेते एडवोकेट तोसीफ शेख, एडवोकेट क्रांती सहाने, आसमा शेख, हलीमा शेख, सलीम मौला पटेल, इब्राहिम यवतमाळ वाला, सत्यवान गायकवाड, सलीम शेख, मोईन शेख, गोविंद साठे इत्यादी मान्यवर आंदोलनामध्ये सामील झाले होते.
इनामदार म्हणाले ” कोटद्वारमध्ये बजरंग दलच्या टोळ्यांनी रस्त्यावर जमून कायदा हातात घेतला. “नाव बदला, नाहीतर परिणाम भोगा” अशा धमक्या देत त्यांनी देहशात भीतीचे वातावरण निर्माण केले. या दहशतीला विरोध करत हिंदू असूनही माणुसकी जपणारे दीपक कुमार पुढे आले आणि ठामपणे सांगितले की, “माझं नाव मोहम्मद दीपक आहे, भारतात नाव आणि धर्मावरून कुणावरही बळजबरी चालणार नाही.” पण संविधानाचा आवाज उठवणाऱ्या दीपक कुमार यांच्यावरच बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. हा हल्ला म्हणजे माणुसकीवरचा हल्ला आहे.”
आज बजरंग दलसारख्या संघटना देशभर उघडपणे दहशत माजवत आहेत. उत्तराखंडमध्ये यापूर्वीही ख्रिश्चन आणि मुस्लिम अल्पसंख्याक समाजावर अत्याचार, धमक्या आणि मारहाणीच्या घटना समोर आल्या आहेत. तरीही सरकार डोळे झाकून बसले आहे. प्रश्न स्पष्ट आहे, ही मूकसंमती नाही का?असा प्रश्न इनामदार यांनी उपस्थित केला.



