
पुणे : बोपदेव घाटात नमाज पठण आणि इफ्तार पार्टी झाल्याच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शहरात सासवडपासून कोंढव्यापर्यंत ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. पुण्यात वाढत असलेल्या लव्ह जिहादच्या घटनांविरोधातही मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला. मुस्लिम धर्मियांची मोठ्या प्रमाणात वसाहत असलेल्या भागात हा मोर्चा झाल्याने तणाव निर्माण झाला होता.
काही दिवसांपूर्वी पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातील बोपदेव घाटात बोपदेव घाटामध्ये काही मुस्लीम तरुणांनी नमाज पठण केले होते. त्यानंतर या प्रकरणावरुन वातावरण तापले. दोन गटांमध्ये राडा झाला. या राड्यानंतर एकाच गटाच्या लोकांवर कारवाई करण्यात आली असा आरोप आहे.
शिवतीर्थ सासवड ते खडीमशीन चौक, कोंढवा असा मोर्चाचा मार्ग होता. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या रॅलीमुळे कोंढवा परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. खडीमशीन चौक येथे बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला होता.
सार्वजनिक ठिकाणी नमाज पढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करा, कोंढव्यातील संबंधितांवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी, तसेच भिवरी ग्रामस्थांवरील खोटे गुन्हे मागे घ्या अशी आंदोलकांची प्रमुख मागणी होती. ही बाईक रॅली पुण्यातील खडी मशीन चौकापर्यंत जाणार होती. तेथे गोपीचंद पडळकर सभाही घेणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी ही बाईक रॅली रोखली. पडळकर खडी मशीन चौकात जाण्यासाठी अडून बसले, मात्र, पोलीस त्यांना सोडायला तयार नव्हते.



