कृषीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयसामाजिक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण

८.५० कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता, १८ हजार कोटी एका क्लिकद्वारे जमा; महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना लाभ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि २६ : राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे १८ हजार कोटी रुपये थेट जमा केले. तसेच देशातील १ लक्ष २५ हजार ‘पी एम किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण केले. हे केंद्र शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याचा महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार पात्र शेतकऱ्यांना लाभ होणार असून सुमारे १ हजार ८६६ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सीकर (राजस्थान) येथे आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याचे वितरण आणि सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कृषिमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्यासह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शेतकरी दूरदृश्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमास उपस्थित होते.

शेतीसाठी लागणा-या वस्तुंसाठी शेतक-यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागत होते. आता बियाण्यांपासुन शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि योजनांची माहिती एकाच ठिकाणी या समृद्धी केंद्रांमध्ये उपलब्ध होईल. शेतक-यासाठी हे समृद्धी केंद्र ‘वन स्टॉप सेंटर’ सारखे काम करेल. तसेच वर्षाअखेरीस देशात असे पावणे दोन लाख केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचेही प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले.

केंद्र सरकारला शेतक-यांच्या कष्टाची जाणीव आहे. म्हणुनच शासनाने ९ वर्षात शेतक-यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेत. बियाण्यांपासुन बाजारपेठपर्यंत नवीन व्यवस्था निर्माण केली. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २ लाख ६० हजार कोटी रुपये शेतक-यांच्या बॅंक खात्यात थेट जमा करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभ देणारी ही जगातील एकमेव योजना आहे. सोबतच युरियाच्या किमतीसुद्धा शासनाने कमी केल्या आहेत. त्यासाठी शेतक-यांना अनुदानही देण्यात येते. भारताताच्या तुलनेत इतर विकसनशील देशात युरियाचे दर चौपट आहेत तर विकसित देशात ते १० ते १२ पट आहेत. शेतक-यांसाठी सल्फर कोटेट युरिया गोल्ड तयार केले आहे. पिकांसाठी आवश्यक असणारे सल्फर युरियासोबतच पिकांना मिळेल आणि त्यामुळे पिकांची चांगली वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल, असा विश्वासही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

देशातील पौष्टिक तृणधान्य आता जगातील मोठ्या बाजारपेठेत पाठविण्यात येत आहे. ‘श्री अन्न’ म्हणुन त्याला विकसित देशातही मागणी आहे. देशात पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन, त्यावर प्रक्रिया आणि त्याची निर्यात या सर्वच बाबीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा लाभ देशातील लहान शेतक-यांना होतोय असेही प्रधानमंत्री मोदी म्हणाले.

राज्यातील ८५.६६ लाख शेतकऱ्यांना लाभ; १ हजार ८६६ कोटी रुपये होणार जमा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याचे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले असून राज्यातील ८५.६६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे, त्या लाभापोटी सुमारे १ हजार ८६६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना ही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करणारी ऐतिहासिक योजना असून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचे ६ हजार व राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे ६ हजार असे वर्षाला एकुण १२ हजार शेतकऱ्याला मिळणार आहेत. शेतक-यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या योजनेचा शेतकऱ्याला मोठया प्रमाणात लाभ होणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी कृषी विभाग काम करत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page