खंडणीसाठी अपहरण करून डांबून ठेवलेल्या दोन वृध्द महिलांची सुटका
कुख्यात गुन्हेगारासह चौघांना खंडणी विरोधी पथकाकडून अटक

महाराष्ट्र मिशन न्यूज नेटवर्क
पुणे : कुख्यात गुन्हेगार बाबुलाल लक्ष्मण मोहोळ व त्याचे साथीदार यांनी खंडणीसाठी अपहरण करून डांबून ठेवलेल्या दोन वृध्द महिलांची खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखेने सुटका करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले.
१) बाबुलाल लक्ष्मण मोहोळ ( वय ४५ वर्षे रा. सरडेबाग, पार्वत अपार्टमेंट समोर, उत्तम नगर ) २) अमर नंदकुमार मोहिते (वय ३९ वर्षे, रा. गणेशनगर, एरंडवणा, ओटा वसाहत ) ३) प्रदीप प्रभाकर नलवडे (वय ३८ वर्षे, राजगुरु अपार्टमेंट भुगाव) ४) अक्षय मारुती फड (वय २४ वर्षे रा. अमर भारत सोसायटी, वारजे माळवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.वैभव भास्कर पोखारे (रा. किरकटवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
मोहोळ याच्यावर यापूर्वी जीव घेण्याचा प्रयत्न, दरोडा, दरोडयाची तयारी, दंगल, अग्निशस्त्रे बाळगणे असे १० गुन्हे व इतर आरोपींवर सुध्दा शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.
बाबुलाल लक्ष्मण मोहोळ व त्याचे साथीदार यांनी पोखारे यांच्या आई मीनाक्षी पोखरे व त्यांच्या सहकारी महिला मनीषा पवार या दोघींचे अपहरण करून डांबून ठेवले. मारहाण करीत सुटकेसाठी १७ लाख रुपयांची मागणी केली.
खंडणी विरोधी पथकाचे अंमलदार शंकर संपते यांना १४ सप्टेंबर रोजी माहिती मिळाली की, मोहोळ उत्तमनगर येथे आहे. माहिती मिळताच पोलीस उप आयुक्त गुन्हे व सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी अधिकारी व अंमलदार यांना टिम तयार करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक प्रताप मानकर फौजदार श्रीकांत चव्हाण व अंमलदार यांनी अपहृत महिला व आरोपींच्या ठावठिकाण्याबाबत माहिती मिळवली. मोहोळ यास जेरबंद करून अपहृत महिलांची सुखरुप सुटका केली.
आरोपींनी पीडित महिलांना १३ तारखेला रोजी सायंकाळी रुद्र हॉटेल उत्तमनगर येथे बोलावले. पुणे स्टेशन येथील स्टॉल मिळवून दिले नाहीत म्हणून ६ लाख रुपयांचा तोटा झाला आहे असे म्हणून दमदाटी करून मारहाण केली.
अपहरण करुन उत्तमनगर येथील एका खोलीमध्ये डांबून ठेवून रात्रभर मारहाण, शिवीगाळ केली. फिर्यादी यास फोनवरुन त्यांच्या सुटकेसाठी १७ लाख रुपयांची मागणी करीत असल्याचे निष्पण्ण झाले.
उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम ३८५.३८७,३६४(अ), ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चार आरोपींना पुढील कारवाईसाठी उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे-२ ) सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खंडणी विरोधी पथकाचे फौजदार मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदीप शितोळे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, सुरेंद्र जगदाळे, शंकर संपते, सदोबा भोजराव, सचिन अहिवळे, चेतन आपटे, इश्वर आंधळे, राहुल उत्तरकर, पवन भोसले, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, किशोर बर्गे, आशा कोळेकर यांनी सहभाग घेतला.



