महाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यातील मंत्र्यांचे फोन टॅप होतात, रोहित पवारांचा खळबळजनक दावा

पुणे : देवेंद्र फडणवीस त्यांच्या मंत्रिमंडळात स्वच्छ आणि नवीन चेह-यांना संधी देणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. पण सध्या तरी यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण पडद्यामागे मोठ्या गोष्टी घडत असल्याची चर्चा आहे. या सगळ्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे फोन टॅप केले जात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. याशिवाय महायुतीतील इतर नेत्यांकडून सातत्याने होणारी वादग्रस्त वक्तव्ये, मारहाणीचे व्हीडीओ आणि मंत्र्यांवर होणारे गंभीर आरोप यामुळे महायुतीच्या अंतर्गत गोटात असंतोष पसरल्याची चर्चा आहे. या आरोपांचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाआघाडीवर होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी मंत्रिमंडळातील वादग्रस्त नेत्यांचा पत्ता कट करत घरचा रस्ता दाखवतील अशी शक्यता आहे.

रोहित पवार यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर एक पोस्ट करत दावा केला आहे. काही मंत्र्यांचे फोन ब-याचदा नॉट रिचेबल येत असून आपले फोन टॅप होत असल्याने मंत्री स्वत:हूनच फोन बंद ठेवतात, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. बघूया या केवळ चर्चा आहेत की वास्तव हे येत्या काळात कळेलच..!’’ असा दावा त्यांनी केला आहे.

महाआघाडीत शीतयुद्ध?

महाआघाडीत नेहमीच शीतयुद्धाच्या चर्चा रंगत असतात. सरकार स्थापनेच्या काळातही असे मतभेद दिसून आले होते. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडण्यास नकार दिला होता आणि काही महत्त्वाच्या खात्यांची मागणीही केली होती. मात्र त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि अखेर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा दावा मागे घ्यावा लागला. याशिवाय, सरकार स्थापन झाल्यानंतर नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा वाद अद्याप सुटलेला नाही.

स्वाक्षरीविना फाईल प्रलंबित

निधी वाटपाच्या बाबतीत अर्थमंत्री अजित पवार वारंवार तक्रार करत असल्याचा उल्लेख शिवसेनेचे मंत्री करतात. अलिकडेच भाजप आमदारांनीही मुख्यमंत्र्यांकडे अशी तक्रार केली असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांचा नगरविकास विभाग निधी वाटपात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोपही होत आहे . त्यामुळे नगरविकास विभागाची कोणतीही फाईल त्यांच्या स्वाक्षरीशिवाय पुढे सरकवली जाणार नाही, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page