लेख: पुणे मुंबई एक्स्प्रेस हायवेवर ३३ तास ठप्प; हजारो नागरिकांना त्रास, गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची वेळ
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर आडोशी बोगद्यात संध्याकाळी ५ वाजताच्या आसपास मुंबई पुणे महामार्गावर टँकर उलटला. टँकर उलटताच त्यातून वायूगळती सुरू झाली. प्रॉपेलिनसारखा अतिशय घातक रसायन वाहून नेणारा टँकर अपघातग्रस्त होण्याची ही पहिलीच घटना होती. गॅस टँकर कसा उलटला हे पाहायला जाऊन नुसती कोणी बिडी जरी ओढली असती तर शेकडो लोक कोळसा झाले असते. त्यामुळे ही परिस्थिती खूप हळूवार हाताळणे भाग पडले. तरीही काही प्रश्न उरतातच.
मुंबई द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटला आणि अनेक तास वाहतूक ठप्प झाली. नशिबाने मनुष्यहानी झाली नाही परंतु हजारो प्रवाशांना झालेला मनस्ताप, त्यांचे फुकट गेलेले कामाचे तास, हजारो वाहनांचे फुकट गेलेले लाखो लिटर इंधन याची जबाबदारी कोणाची ?
जड अवजड वाहनांची बेलगाम वाहतूक द्रुतगती मार्गावर रोजच सुरू असते. व्यवस्थेवर काहीही परिणाम होत नाही. भरमसाट टोल भरणे हे सामान्य नागरिकांचे कर्तव्य आहे , परंतु अपघात, नुकसान आणि मनस्तापाची जबाबदारी कोणावर निश्चित करणार? गॅस टँकर चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला असला तरी धोकादायक वायू किंवा इंधन यांच्या वाहतुकीची रात्रीची, अन्य वाहनांची वर्दळ नसतानाची वेळ ठरवता येणार नाही का?
काही दशके आधी खंडाळा घाट हा रोज १५/२० तास जाम असायचा. त्याकाळी असलेली वाहनसंख्या आता शंभरपट वाढली आहे, सरकारी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे पोलीस, ‘एनएचएआय’ अधिकारी यांचे ढिसाळ कामकाज आणि एकुणच दिखाऊपणाचे सुचना फलक यांचा बोजवारा उडाला.
आपत्ती नियोजनाचा अभाव ३३ तास हाल
आडोशी बोगद्याजवळ टँकर उलटला आणि पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवे ३३ तास ठप्प झाला. कारण साधे आहे, २५ वर्षांत आपत्ती व्यवस्थापनाचा विचारच केला नाही.
मुंबईकडे जाणारी बाजू वाहतुकीने भरलेली, पुण्याकडे येणारी बाजू जवळजवळ रिकामी. दोन्हीमध्ये फक्त दुभाजक, तो तात्पुरता काढून उलट दिशेने एक लेन वापरता आली असती. पूर्ण वाहतूक ठप्प न होता किमान संथ गतीने का होईना, कोंडी सुटली असती.
बोगद्यांप्रमाणेच एक्सप्रेस हायवेवरही आणिबाणीच्या वेळी दोन्ही बाजू जोडता येतील अशा जागा असायलाच हव्यात. पण यांना इंटरेस्ट आहे तो फक्त टोल वसुलीत. लाखो रुपये पगार व भत्ते घेणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना हा साधा उपाय सुचत नाही? कारण नियोजन नव्हे, फक्त कमाई हाच उद्देश आहे.
गोंधळ नक्कीच टाळता आला असता
अपघात झाल्यानंतर दोन तासांतच डिजिटल साइन बोर्ड, एसएमएस अलर्ट आणि टीव्ही- समाजमाध्यमांतून धोक्याची सूचना दिली असती, तर हजारो गाड्या आधीच पर्यायी मार्गावर वळल्या असत्या. लोणावळा आणि खालापूर टोल नाक्यावरच प्रभावी नाकेबंदी करता आली असती. एक्स्प्रेसवेवर ठरावीक अंतरावर आपत्कालीन एक्झिट किंवा यू-टर्न पॉइंट्स नसल्यामुळे, एकदा घाटात शिरलेली वाहने अडकून पडली. अशा परिस्थितीत पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एकाच बाजूने दुहेरी वाहतूक सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होते, मात्र निर्णयातील विलंबाने परिस्थिती हाताबाहेर गेली.
प्रोपिलिनसारख्या घातक रसायनांची हाताळणी करण्यासाठी आपल्याकडे प्रशिक्षित स्थानिक पथकांचा अभाव असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. ‘बीपीसीएल’च्या तज्ज्ञांची प्रतीक्षा आणि मॅन्युअल पद्धतीने गॅस हस्तांतर यामुळे ३३ तास लागले. अद्ययावत रोबोटिक उपकरणे आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला असता, तर गळतीची तीव्रता लवकर मोजून मार्ग मोकळा करता आला असता. सारा गोंधळ संवादाच्या अभावामुळे झाला.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ‘स्मार्ट हायवे मॉनिटरिंग’ आणि प्रत्येक टोल नाक्यावर इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर’ असणे अनिवार्य आहे. आजपर्यंत असा काही धोका निर्माण होऊ शकतो याचा अंदाज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना का आला नाही? दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा टोल जमा करणे हेच या प्राधिकरणाचे किंवा त्यांनी नेमलेल्या ठेकेदाराचे काम आहे का?
दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. ही बाब लक्षात घेऊन भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, तसेच घडल्यास आणखी कोणती काळजी घेतली पाहिजे? या संदर्भात शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एमएसआरडीसी’ला दिले आहेत.
परिस्थितीची गंभीरता ओळखून महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील सुमारे ४० जणांची टीम घटनास्थळी दाखल झाली. सुरुवातीला गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्या टँकरमध्ये प्रॉपेलिन हे अत्यंत ज्वलनशील आणि धोकादायक रसायन असल्याचे लक्षात येताच संपूर्ण यंत्रणा अधिक सतर्क झाली. अशा परिस्थितीत अगदी छोटासा स्पार्कसुद्धा मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकत होता. त्यामुळे कोणतीही घाई न करता तज्ज्ञांना तातडीने पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा प्रकार अतिशय संवेदनशील असून काळजीपूर्वक हाताळणं आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. लगेचच राज्य सरकारला याची माहिती देण्यात आली, असा दावा सरकार पक्षातर्फे केला जातो आहे.
बीपीसीएल’ आणि ‘एनडीआरएफ’ला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दुसऱ्या दिवशी पहाटे सुमारे ४.३० वाजल्यापासून ‘एनडीआरएफ’ आणि ‘बीपीसीएल’च्या तज्ज्ञ पथकांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. त्यांना टँकरवरील दोन व्हॉल्व्ह बंद करण्यात यश आले. मात्र, एका ठिकाणाहून अजूनही गळती सुरू होती. त्यामुळे रिकामे टँकर घटनास्थळी आणून त्यामध्ये हे रसायन सुरक्षितपणे हस्तांतरित करण्याचे काम सुरू करण्यात आले. एक टँकर भरून झाल्यानंतर दुसऱ्या टँकरमध्ये प्रॉपेलिन हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली. जर वाहतूक बंद केली नसती, छोटीशी निष्काळजी मोठे नुकसान करणरी ठरली असती. म्हणून या महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली, असेही सांगितले गेले.
दरम्यान, मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी होण्याचे मुख्य कारण आहे घाटातील काही अरूंद भाग. यावर पर्याय म्हणून मार्च २०१९ मध्ये १३.५ किमीचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला. हा प्रकल्प मूळ उद्दिष्टानुसार २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र कोरोना संकटामुळे तो दोन वर्षे पुढे गेला आणि तो २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते , त्यानंतर तारीख पे तारीख करत आता हा प्रकल्प पूर्ण होण्याचा नवीन मुहूर्त १ मे २०२६ झाला आहे.
१३.३ किमी च्या या प्रकल्पामध्ये २ बोगदे आणि २ पूल बांधण्यात येणार आहेत. सह्याद्री मधला हा अवघड टनेल आहे असे कारण सांगून विलंबाचे समर्थन केले जाते आहे. याच सह्याद्री मध्ये ३० वर्षांपूर्वी ९० बोगदे आणि २००० पूल असलेला ७४० किमीचा कोकण रेल्वे प्रकल्प १९९० ते १९९८ अशा आठ वर्षांत पूर्ण करण्यात आला होता हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्या काळापेक्षा तंत्रज्ञान, मशिनरी कितीतरी पटीने अद्ययावत झाली असूनही हा मिसिंग लिंक प्रकल्प रखडण्याची चौकशी होणे गरजेचे आहे.
या प्रकल्पासाठी जनतेच्या करांचे ६५०० कोटी रुपये खर्च होणार आहेत आणि गेल्या ३६ तासांत वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या हजारो वाहने , नागरीक यांचा वेळ आणि पैसा याचीच किंमत कदाचित यापेक्षा जास्त असेल. प्रशासनाची उदासीनता , निष्क्रियता आणि असंवेदनशील वर्तणूक या सगळ्याच्या मुळाशी आहे आणि असहाय्य नागरीक चडफडण्याशिवाय काहीच करू शकत नाहीत हे दुर्दैव आहे.
ट्रॅफिक हायवेला येण्यापासून रोखणे आवश्यक होते
तळेगावहून येणारे ट्रॅफिक आणि पनवेलवरून येणारा ट्रॅफिक लोड हा अपघातग्रस्त ठिकाणच्या आसपास कट ऑफ केला असता तर एवढी भयंकर परिस्थिती निर्माण झाली नसती. एक स्पीकर अनाउन्समेन्ट करून लोकांना सांगितले असते , एफएम रेडिओचा वापर केला असता लोक हायवेला आले नसते. शहरातून येणारा ट्रॅफिक हायवेला येण्या पासून कट ऑफ करायचा असतो हे भान ठेवले गेले नाही. त्यामुळे पुण्याकडून जाणारी वाहतूक वाढतच जाऊन वाहनचालकांना उलट फिरणे कठीण झाले.



