मेघालयच्या बेकायदेशीर कोळसा खाणीत झालेल्या स्फोटानंतर मृतांची संख्या २५ वर

शिलाॅंग : मेघालयच्या पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यातील थांगस्कू परिसरात बेकायदेशीर कोळसा खाणीत झालेल्या स्फोटानंतर, शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. स्फोटातील मृतांची संख्या शुक्रवारी २५ वर पोहोचली.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी सांगितले की, खाणीतून आणखी चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच कुटुंबीयांनी नेलेले दोन मृतदेह परत आणण्यात आले, तर आणखी एका व्यक्तीचा रुग्णालयात भाजल्यामुळे मृत्यू झाला.
“मृत व्यक्ती आसाम, मेघालय आणि नेपाळचे आहेत. आम्ही नऊ जणांना वाचवले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत,” असे ते म्हणाले. त्यापैकी डझनभर लोकांची ओळख पटली असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्फोटाच्या वेळी खाणीत किती लोक होते हे पोलीस निश्चित करू शकलेले नाहीत, कारण जखमींची बोलण्याची स्थिती नव्हती, असे ते म्हणाले. तथापि, अटक केलेल्या दोन व्यक्तींकडून माहिती मिळवण्याची पोलिसांना आशा आहे.
शुक्रवारी सकाळी, बचाव आणि तपास कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी कॅबिनेट मंत्री लखमेन रिम्बुई आणि वैलाडमिकी शिला शिलाँगहून ख्लिहरियाट येथे पोहोचले.
एप्रिल २०१४ पासून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) धोकादायक ‘रॅट-होल’ पद्धतीवर संपूर्ण बंदी घातलेली असतानाही, खाणकाम कसे सुरू होते, हे शोधण्यासाठी राज्याच्या खाणकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले.
मुख्यमंत्री संगमा यांनी शिलाँगमध्ये सांगितले की, राज्य सरकार बेकायदेशीर खाणकाम मोहिमांवर कठोर कारवाई करत आहे आणि या अपघातासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
अवैध खाणकाम सहन केले जाणार नाही, कारण आम्ही वैज्ञानिक खाणकामाची प्रक्रिया सुरू केली आहे,” असे ते म्हणाले.
संगमा म्हणाले की, अलिकडच्या वर्षांत पोलिसांनी अवैध खाणकामाशी संबंधित १,००० हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत आणि शेकडो लोकांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. “दुर्गम भूभाग आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे येणाऱ्या आव्हानांना न जुमानता अंमलबजावणी सुरूच आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी असेही सांगितले की, संपूर्ण राज्यात अवैध खाणकाम शोधण्यासाठी सॅटेलाइट प्रतिमा आणि ड्रोनचा वापर केला जात आहे.
शिलाँग मतदारसंघातील मेघालयच्या दोन लोकसभा सदस्यांपैकी एक असलेले रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन यांनी या मृत्यूंसाठी राज्य सरकार आणि कोळसा मंत्रालयावर टीका केली. ते म्हणाले “अनेक ठिकाणी बेफामपणे अवैध कोळसा खाणकाम सुरूच आहे…”



