पंजाबची जनताच गद्दारांना त्यांची जागा दाखवेल
आम आदमी पार्टी महाराष्ट्रचे प्रवक्ता मुकुंद किर्दत यांची प्रतिक्रिया

मुंबई : पुढच्या वर्षी होणाऱ्या पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्ष फोडाफोडीचे षडयंत्र सुरू केले आहे. गद्दार राघव चड्डा यांचा भाजप प्रवेश अपेक्षितच होता. काही दिवसांपूर्वी नेतेपदावरून राघव चड्ढांची तडकाफडकी उचलबांगडी करत अशोक मित्तलना आपने राज्यसभेत उपनेते केले अन् लगेच त्यांच्यावर ईडीचा छापा पडला, आता तेच मित्तल भाजपत गेले आहेत! हे उघड दबाव तंत्र आहे. परंतु पंजाब मधील जनता आम आदमी पार्टीच्या मागे आहे आणि येणाऱ्या काळात पंजाबची जनताच या गद्दारांना त्यांची जागा दाखवेल, अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टी महाराष्ट्रचे प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केली आहे.
किर्दत यांनी सांगितले की वास्तवात पंजाब मध्ये भाजप हा दुर्बल, छोटा पक्ष आहे. परंतु पंजाब मध्ये मोफत उपचार, शिक्षण, टोल फ्री रस्ते, शेतांना कालव्यातून पाणी, वंचित महिलाना १५०० रु महिना, अशा लोकप्रिय योजना राबवणाऱ्या भगवंत मान यांच्या सरकारचे खच्चीकरण करण्यासाठी ही फोडाफोड केली गेली आहे.
राघव चड्डा यांनी आता जनतेसोबत जाणार असल्याचे म्हटले आहे,खरे तर अशा वेळेस त्यांनी आम आदमी पार्टी कडून मिळालेल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन जनतेतून निवडून यायला हवे. परंतु हे न करता, खासदारकी टिकवण्यासाठी, गटबाजी करण्यासाठी भाजपचे एजंट म्हणून गेले काही दिवस ते काम करत होते. इलेक्टरल बाँड मार्फत भ्रष्टाचार करणारा, पंजाब मधील शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा कायदा आणू पाहणाऱ्या भाजप मध्येच ते सामील होत आहेत. स्वाती मालीवाल, संदीप पाठक हे खासदारकी टिकवण्यासाठी त्यांना सामील होत आहेत. त्यामुळे राघव चढ्ढा यांनी हास्यास्पद विधाने करू नयेत, असे कीर्दत यांनी म्हटले आहे.
गुजरात मध्ये स्थानिक निवडणुका परवा असून त्या मध्ये आप ला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आज तेथील प्रचार संपत आहे. त्यामुळे कदाचित हा भाजप प्रवेश मुहूर्त राघव चड्डा यांनी काढला असावा,असा टोला त्यांनी लगावला.



