श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा पर्दाफाश: अटक केलेल्या २०० आरोपींमध्ये सर्वाधिक भारतीय

कोलंबो : श्रीलंका सरकारने आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालण्यासाठी सुरू केलेल्या धडक मोहिमेत आतापर्यंत २०० परदेशी नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये १७३ भारतीय आणि २५ नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकन पोलिसांनी दिली आहे.
श्रीलंकन पोलीस दलाचे प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळ्या प्रामुख्याने ‘व्हॉट्सॲप’ आणि ‘टेलिग्राम’ सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून लोकांची फसवणूक करत होत्या. पोलिसांनी सांगितले की: “हे आरोपी पर्यटक म्हणून श्रीलंकेत आले होते, मात्र त्यांनी गाले आणि हिक्काडूवा येथील भाड्याच्या बंगल्यांमधून अवैध कॉल सेंटर्स सुरू केली होती. आम्ही त्यांच्याकडून शेकडो मोबाईल फोन, लॅपटॉप आणि सिम कार्ड्स जप्त केली आहेत.”
या प्रकरणावर भाष्य करताना आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. आग्नेय आशियाई देशांमध्ये (उदा. म्यानमार, कंबोडिया) सायबर गुन्हेगारांविरुद्ध कडक कायदे झाल्यामुळे आता या टोळ्यांनी श्रीलंकेसारख्या देशांकडे आपला मोर्चा वळवला आहे. अटक केलेले आरोपी प्रामुख्याने ‘डिजिटल अरेस्ट’ आणि ‘ऑनलाइन गुंतवणूक’ यांसारख्या फसवणुकीच्या प्रकारात सक्रिय होते. “या टोळ्या एका देशात बसून दुसऱ्या देशातील नागरिकांना लक्ष्य करतात, ज्यामुळे तांत्रिक तपासात अनेक कायदेशीर आणि भौगोलिक अडचणी येतात,” असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
श्रीलंकन गुन्हे शाखेने (CID) स्पष्ट केले आहे की, ही केवळ एका टोळीपुरती मर्यादित कारवाई नसून, हे एक मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. अटक केलेल्या १७३ भारतीयांच्या पार्श्वभूमीची तपासणी करण्यासाठी श्रीलंकन प्रशासन आता भारतीय दूतावास आणि इंटरपोलच्या संपर्कात आहे.
‘महाराष्ट्र मिशन’ विशेष:
ही कारवाई केवळ श्रीलंकेपुरती मर्यादित नसून, भारतातील सायबर सुरक्षा यंत्रणांसाठीही हा एक मोठा इशारा आहे. परदेशात बसून भारतीयांचीच फसवणूक करणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यामुळे आता अशा गुन्ह्यांच्या तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.



