जालना कार अपघातात मोठा ट्विस्ट; पतीनेच पत्नीला जिवंत जाळले, धक्कादायक कारण समोर

जालना : कार अपघाताचा बनाव करून पतीनेच पत्नीचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूल होत नसल्याने पतीने हा कट रचल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शेगाव येथून गजानन महाराजांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या जोडप्याच्या कारला मंठा- लोणार रस्त्यावर 23 जूनच्या पहाटे अपघात झाला होता. पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने कारला आग लागली. या आगीत कारमध्ये बसलेल्या महिलेचा जळून मृत्यू झाला होता. 32वर्षीय सविता सोळुंके असं या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव होते. मात्र, आता या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट आला आहे. पतीनेच पत्नीला जिवंत जाळल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले आहे. दोघांच्या लग्नाला 13 वर्षे झाले होते. तरीही मूल-बाळ नव्हते, याचा राग पतीच्या मनात होता. या रागातूनच त्याने पत्नीला जिवंत जाळल्याचे समोर आले आहे. अमोल सोळुंके असं आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
मूलबाळ होत नसल्याने अमोल सविताला मारहाण करायचा तसंच, शारिरीक आणि मानसिक त्रासही द्यायचा. अमोलने सविताकडे घटस्फोटाची मागणी केली होती. मात्र सविताने त्याला नकार दिला होता, याचाच राग अमोलच्या मनात होता.
23 जूनच्या पहाटे त्याने अपघाताचा बनाव रचला शेगावकडून परतत असताना पतीनेच त्यांच्या कारला आग लावली. यात तिचा होरपळून मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांने पोलिसांना अपघातात कारला धडक बसली. कार सेंटर लॉक झाल्याने तिला बाहेर पडता आले नाही तितक्यात कारने पेट घेतला आणि आग लागली, अशी खोटी माहिती त्याने दिली होती.
दरम्यान, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सविता यांच्या भावाला संशय आला आणि त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली. त्याप्रमाणे पोलिसांनी अमोल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्याचा संशय खरा ठरला. जालना पोलिसांनी अमोलला अटक केली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



