गांधी कुटुंबाची नाहक बदनामी केल्याबद्दल मोदींनी जाहीर माफी मागावी
हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा आहे. केवळ सोनिया व राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी रचलेले एक कुंभाड असल्याचे आज उघड झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाने नाहक बदनामी केल्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत सपकाळ पुढे म्हणाले की, ईडी सारख्या सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा भाजपाचा अजेंडा आहे. न्यायालयाच्या निर्णयाने दूध का दूध पाणी का पाणी झाले आहे. नॅशनल हेराल्ड ही कंपनी स्वातंत्र्य़ चळवळीच्या वेळी ब्रिटिशांविरोधात लढताना एक अजेंडा चालवण्यासाठी देशप्रेमातून स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेच्या स्थापनेसाठी स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतः पैसे दिले होते. ही संस्था एक वर्तमान पत्र चालवत होती व ना नफा तत्वावर या संस्थेचे काम चालत होते व आहे.
सपकाळ म्हणाले ”स्वातंत्र्यानंतरच्या काळात या संस्थेत काम करणाऱ्या पत्रकार, कर्मचारी यांचे पगार देण्याचा प्रश्न उद्भवला तेव्हा काही व्यवहार झाले पण त्यातून कोणत्याही सभासदाला लाभांश वगैरे आर्थिक लाभ झालेला नाही. पण मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप करत भाजपाने खोटे गुन्हे दाखल करण्यास तपास यंत्रणाना भाग पाडले. सोनिया व राहुल यांना तासनतास चौकशीच्या नावाखाली त्रास देण्यात आला. आज भाजपाचा खोटेपणा उघड झाला.”



