पाणंद रस्त्यावर अतिक्रमण केल्यास शासकीय योजनांचे लाभ बंद होणार?

मुंबई : पाणंद रस्त्यांच्या संदर्भात राज्य सरकार कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. पाणंद रस्त्यावर अतिक्रमण केल्यास शासकीय योजनांचा लाभ बंद होणार. असा कठोर निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. त्यामुळे याविषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पाणंद रस्त्यांच्या संदर्भात राज्य सरकार कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. राज्यात ४० हजार पाणंद रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी अतिक्रमण केल्याणे हे रस्ते खोळबंले असल्याचे समोर आले आहे. ही अतिक्रमणे वेळेत काढली नाहीत तर तात्काळ शेतक-यांचा शासकीय लाभ बंद करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यात या रस्त्यांसाठी रामटेक पॅटर्न राबविण्याचाही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती आहे. पाणंद रस्त्यांसाठी ज्या शेतक-यांच्या जमिनी बाधित होतील त्यांनाही लाभ देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
पाणंद रस्ते तयार करण्यासाठी मार्च ते मे हे दोनच महिने मिळत असल्याने यंत्राच्या साह्याने तयार करण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. त्यामुळे याविषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



