
मुंबई : मराठ्यांच्या आरक्षणाला कुठेही वेगळा फाटा दिला जाईल असे एकही पाऊल सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचे नाही. आमचे आरक्षण हक्काचे आहे. बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नये, एवढी आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे.
मराठ्यांचे आणि मराठ्यांच्या पोरांचे वाटोळे होईल असे एकही पाऊल आपण जातीयवादी नेत्यांचं ऐकून उचलू नये असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. वडेट्टीवार म्हणतायत, मराठा आरक्षणासाठी जो जीआर केलाय तो रद्द करण्याची आमची मागणी आहे. त्याचे कोण ऐकतंय बुगळ्याचं त्या. त्या लाल्याने सांगितलं असेल, कारण काँग्रेस मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलतेय असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
ओबीसींचा नेता कोणी नाही. जास्त बोलतात म्हणून मुख्यमंत्र्यांनी बोलवून घेतले आहे. मुख्यमंत्र्यांना यांची औकात कळली आहे. हे ओबीसींचे नेते होऊ शकत नाहीत, हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलंय. त्यामुळे बापाची पेंड आहे का? जीआर रद्द करणं. हैदराबाद गॅझेटच्या आधारे जीआर काढलाय. आमची पण मागणी आहे, १९९४ चा जीआर रद्द करा. वरचं २ टक्के आरक्षण ते पण रद्द करा. काहींनी असं सांगितलं की, आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो. म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण घेतलं, ते बंजारा समाजासारखे दिसत नाहीत. त्यांना बाहेर काढा. यापुढे जशाला तशी फाईट होणार’’असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
पळायलाही जागा उरणार नाही
ओबीसीत ४००-५०० जाती आहेत. छगन भुजबळ थोड्या माळ्यांचा नेता आहे, सगळ्या माळ्यांचा नाही. हे जातीचे नेते आहेत, यात ओबीसींचा संबंध नाही. काही गरज नाही याच्या मागेमागे पळायची. मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगणं आहे की, मराठ्यांच्या आरक्षणाच्या जीआरचा अवमान होईल, असं त्यांचं ऐकून पाऊल उचलायचं नाही.



