
सातारा : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शनिवारी शपथ घेतल्यानंतर तिस-याच दिवशी २ फेबु्रवारी रोजी (सोमवारी) सुनेत्रा पवार कराड दौ-यावर आल्या. दिवंगत अजितदादांसारखाच वक्तशीरपणा त्यांच्यात यावेळी पाहायला मिळाला. ज्येष्ठ नेते दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी त्यांनी अभिवादन केले. परंतु, माध्यमांशी संवाद साधणे कटाक्षाने टाळले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा पहिलाच दौरा नि:शब्द ठरला.
सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता त्या कराडमध्ये दाखल झाल्या. शासकीय विश्रामगृहात अर्धा तास थांबून बरोबर १० वाजता त्या प्रीतिसंगमावर पोहोचल्या. त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यसभा खासदार नितीन पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी खासदार श्रीनिवास पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. ज्येष्ठ नेते दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले.
सुनेत्रा पवार कराड दौ-यावर येणार असल्याची बातमी वा-यासारखी पसरली होती. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आबाला वृद्धांनी प्रीतीसंगम बागेत गर्दी केली होती. स्मृतिस्थळावरून परत जात असताना अनेक महिलांनी त्यांची भेट घेतली. महिलांना पाहून सुनेत्रा पवार थांबल्या. सर्वांना त्या हात जोडून नमस्कार करत होत्या. त्यांच्या चेह-यावरील भाव अत्यंत गंभीर होते. प्रीतिसंगमावरून थेट त्या वेणूताई चव्हाण ट्रस्टकडे रवाना झाल्या.
अजित दादांच्या पावलावर पाऊल ठेवत सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणयांच्या प्रीतीसंगमावर नतमस्तक झाल्या. दिवंगत अजित पवार नेहमीच प्रीतीसंगमाला भेट देत आले असून, त्यांच्या राजकीय जीवनात नेहमीच यशवंतराव चव्हानांच्या विचारधारांचं पालन करत आले आहेत.

विदीप जाधवांच्या पत्नीचे केले सांत्व
उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ५ जणांचा बारामती येथे २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. यामध्ये साता-यातील तरडगावच्या विदीप जाधव यांनी देखील जीव गमावला होता. ते मुंबई पोलीस दलात कार्यरत होते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणून सेवा बजावत होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री सूनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या पत्नीची भेट घेतली. विदीप जाधव यांच्या पत्नी म्हणाल्या, शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहणार असे त्यांनी सांगितले. माझे मिस्टर शेवटपर्यंत दादांबरोबर होते.
त्यांनी कधीच दादांना अंतर दिले नाही आणि दादांनीही कधीच त्यांना अंतर दिले नाही. त्याचप्रमाणे वहिनीसोबत माझ्याबरोबर आयुष्यभर राहाणार आहेत. माझ्या मुलांकडे आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाकडे त्याचे लक्ष राहिले. आता आमचे नाते घरच्यासारखे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. माझे आणि त्यांचे दु:ख सारखंच आहे, माझे सर्वस्व गेलंय, तसंच त्यांचंही गेलंय. तरीही त्या उभ्या आहेत, त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवलाय. त्या माझ्याबरोबर आयुष्यभर राहतील.
विदीप जाधव हे आपल्या कामाबाबत अत्यंत निष्ठावान आणि जबाबदार अधिकारी म्हणून ओळखले जायचे. अजित पवार यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर होती.



