मुंबईत चार बांगलादेशी घुसखोरांना अटक

मुंबई : मुंबईतील मालाड परिसरातील कुरार येथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ते त्यांची ओळख लपवून वसईमध्ये व्यवसाय करत होते. तुहिनूर सरदार (३०), अब्दुल बिस्वास (५२), नजरुल बिस्वास (४१) आणि इमामुल रहेमान (४६) असे ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांचे नावे आहेत. तुहिनूर चिकन शॉपमध्ये काम करत होता, तर अब्दुल हा बिगारीकाम, नजरुल भंगार खरेदी-विक्रीचे काम आणि इमामुल बिगारीकाम करत होता. कुरार पोलिसांनी केलेल्या झडतीत या आरोपींकडे बांगलादेशचे कायम रहिवासी प्रमाणपत्र, नागरिकत्व प्रमाणपत्र आणि बांगलादेश नॅशनल आयडी कार्ड आढळून आले आहेत. तपासात ते बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांना मायदेशी परत पाठवण्याची कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.



