
नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता सायबर टीमने याला आळा घातला आहे. या पार्श्वभूमीवर एसआयटी च्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी सांगितले की, लोक काय म्हणतील या भीतीने महिलांनी अन्याय सहन केला आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटवू नका. त्यांचे व्हिडीओ व्हायरल करू नका, आणि मोबाईलमध्ये त्यांचे व्हिडीओ ठेवू नका. हे आपले कर्तव्य असून त्यांचे मानसिक आरोग्य आणि धैर्य टिकवून राहिले पाहिजे. अशा केसेसमध्ये पोलिसांच्या पत्रकार परिषदांनाही मर्यादा निश्चित केल्या आहेत.
सातपुते यांनी म्हटले की,पीडितेच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचे ज्या प्लॅटफॉर्मवर दिसून येत आहे, तिथून ते व्हिडीओ हटवण्यास सांगितले आहे. पीडितांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचाराच्या पीडितांची ओळख उघड केल्यास शिक्षा होणार आहे. पीडितांच्या व्हिडीओच्या एकूण ४६५० लिंक्स सायबर टीमने डिलिट केल्या आहेत. ४ जणांची टीम व्हिडिओवर लक्ष ठेऊन आहेत. हे लोक पूर्णवेळ तेच काम करत आहेत. काही मिनिटांमध्ये नवीन काही अपलोड झाले का ते शोधणे आणि त्याला रिपोर्ट करण्याचे काम सुरू आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वारंवार टाकणाऱ्या ग्रुपला बंद केले आहे. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोन जणांना तसेच अहिल्यानगर पोलिसांनीही सहा जणांना अटक केली आहे.
सातपुते पुढे म्हणाल्या की, चौकशीतून आरोपी खरात पीडित व्यक्तीच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत धमकी देत होता. भीती दाखवत होता. खडे, चिंचोके इत्यादी गोष्टीद्वारे पैसा उकळत होता. महिलांना दैवी शक्ती असल्याचे सांगत होता. कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून, त्यांना बदनामीची धमकी देऊन लैंगिक शोषण करत होता. ईशान्यश्वर मंदिराच्या परिसरात अंधारात दैवी शक्ती असल्याचे भासवून अंधश्रद्धा पसरवत होता.



