मुंबईराजकारण

उबाठा गटात ‘संशय कल्लोळ’चे प्रयोग जोमात

शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा उबाठावर निशाणा

मुंबई : खासदारांमधील असंतोषला रोखण्यासाठी खोट्या बातम्या पेरणाऱ्या उबाठा गटावर शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी आज जोरदार निशाणा साधला. उबाठा गटात संशय कल्लोळ नाटकाचा प्रयोग जोमाने सुरु असून उबाठा खासदारांना रोज निष्ठा कागदावर लिहून द्यावी लागते, आणभाका घ्यावा लागतात आणि अग्निपरिक्षा द्यावी लागते, असा टोला खासदार डॉ. वाघमारे यांनी लगावला. निष्ठेसाठी खासदारांसाठी जो न्याय आहे तोच न्याय युवराजांवर लावणार का? खासदारांच्या निष्ठा तपासणारे युवराजांच्या निष्ठा तपासणार का, असा सवाल खासदार डॉ. वाघमारे यांनी केला.

खासदार डॉ. वाघमारे म्हणाल्या की, उबाठा गट संशयाच्या गर्तेत अडकला आहे. खासदारांना दररोज निष्ठेच्या आणाभाका घ्यावा लागत आहेत. मात्र आदित्य ठाकरेंना मातोश्रीने पाठिशी घातलं आहे. खासदारांना निष्ठा सिद्ध करण्यासाठी आदेश देणारे आदित्यबाबत मूग गिळून गप्प का? इथं आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशा पद्धतीचा न्याय बघायला मिळतोय, असे त्या म्हणाल्या. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सर्वांना समान वागणूक द्यायचे ते शिवसैनिकांना संवगडी समजायचे पण तुम्ही मात्र इतरांना घरगड्यासारखी वागणूक देताय, अशी घणाघाती टीका खासदार डॉ. वाघमारे यांनी उबाठावर केली. उबाठा खासदारांची अवस्था संशयी नवऱ्याबरोबर नाईलाजाने नांदणाऱ्या बायकोसारखी झाली आहे, जिथं त्यांना रोज पुन्हा पुन्हा आपली निष्ठा सिद्ध करावी लागतेय अशी खरमरीत टीका खासदार डॉ. वाघमारे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page