
मुंबई : राज्याच्या काही भागात पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे. काही पेट्रोल पंपांवर रात्रीपासून वाहनांच्या रांगा लागत आहेत. सध्या शेती कामे सुरु झाली आहेत. मशागतीसाठी डिझेलची गरज लागते. त्यामुळे ग्रामीण भागात पेट्रोल पेक्षा डिझेलचे संकट अधिक दिसत आहे.
पेट्रोल-डिझेल तुटवड्याचा परिणाम होऊन जळगाव जिल्ह्यात खाद्य तेलाच्या किमतीमध्ये ३ ते ५ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. डिझेल तुटवडा, पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. ट्रान्सपोर्ट तसेच वाहतुकीचे दर वाढल्याने परिणामी खाद्यतेलाच्या दर वाढल्याची विक्रेत्यांची माहिती. डिझेल तुटवड्यामुळे खाद्य तेलाची वाहतूक करणारी वाहने तेल कंपन्यांमध्ये थांबून असल्याची विक्रेत्यांची माहिती आहे. डिझेल वेळेवर मिळत नसल्यामुळे खाद्यतेलाची दररोज येणारी १५ ते २० टँकर कंपन्यांमध्ये चार ते पाच दिवसांपासून उभे असल्याने खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
दरम्यान ,पेट्रोल-डिझेलचा साठा करु नका असे आवाहन शासन करत आहे. काही जण अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गाडी, बाईकची टाकी फुल करण्यासाठी धाव घेत आहेत. हे सुद्धा पेट्रोल-डिझेलचा साठा लवकर संपण्यामागचे एक कारण आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल-डिझेल बाबत महत्वाची माहिती दिली आहे.
ते म्हणाले “सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत. पेट्रोल-डिझेल विशेष करुन डिझेल काही लोक शेतीसाठी वापरतात. त्यामुळे स्वत: लक्ष घालून पेट्रोल-डिझेलची साठेबाजी करु देऊ नका. आवश्यकतेनुसार डिझेल मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरु आहेय. काही ठिकाणी निश्चित तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. पण सर्वदूर अशी स्थिती नाही. एखाद-दुसरी घटना होते, ती हायलाईट केली जाते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमुळे भारतात हे पेट्रोल-डिझेलचे संकट निर्माण झाले आहे. पेट्रोल-डिझेलमुळे डॉलरसमोर रुपया रोज घसरतोच आहे. पण त्याहीपेक्षा आज पेट्रोल-डिझेल वेळेवर मिळत नाही ही खरी समस्या आहे. हॉर्मुज स्ट्रेटमध्ये जलवाहतूक अजून सुरळीत झालेली नाही. इराणने समृद्ध युरेनियम अमेरिकेकडे सोपवण्याची अट मान्य केली नाही, तर अमेरिकेकडून पुन्हा युद्धाची घोषणा होऊ शकते. तशी सध्या स्थिती दिसत आहे. कारण इराण अमेरिकेच्या अटी मान्य करायला तयार नाहीय. पुन्हा युद्ध सुरु झाले, तर ऊर्जा संकट अजून गंभीर होऊ शकते.



