‘पुष्पा’ स्टाइलने तेलाच्या टँकरमधून गांजा तस्करी, सहा जणांना बेड्या, १ कोटी ९ लाखाचा मुद्देमाल जप्त
लातूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

लातूर, संग्राम म्हेत्रे : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे तेलाच्या टँकरमधून गांजाची वाहतूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी तब्बल ३ क्विंटल गांजासह १ कोटी ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, बुधवारी ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत २ किलो गांजासह पांढऱ्या रंगाची कार असा एकूण २ लाख ५० हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी अमोल ज्ञानोबा गोरे (रा .वडवळ नागनाथ ता . चाकूर) व एक संशयित महिला आरोपीला अटक करण्यात आली होती. या संशयित आरोपींना पोलीस कोठडी मिळाल्याने त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की , हा २ किलो गांजाचे पॉकेट हे सिम्पल असून लातूर, नांदेड, नाशिक येथील गांजा विकणाऱ्या लोकांना सॅम्पल दाखवण्यासाठी याचा उपयोग करत होते. बाकीचा गांजा हा एका टँकरमध्ये टाकून विशाखापटनम येथून देगलूर मार्गे उदगीर येथे आणला आहे. रस्त्याने संशय येऊ नये म्हणून तेलाच्या टँकरचा उपयोग करीत असल्याची कबुली त्यांनी दिली. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेवून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे तीन अधिकारी असलेले एकूण चार पथके तयार करून तपासाचे आदेश देण्यात आले होते.
आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार हाकनकवाडी शेत शिवारामध्ये एका शाळेच्या पाठीमागे उभा केलेला टँकर क्रमांक (एम.एच ४६ ए.आर. ०६५९) मधून १४ पोते गांजा ३ क्विंटल २ किलो किंमत ७५ लाख व टँकरची किंमत ३२ लाख, २ लाख किंमतीची कार असा एकूण १ कोटी ९ लाख ५० हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार फुलारी, पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे, गणेश कदम, रवींद्र तारु, परशुराम देवकते, आयुब शेख, माधव केंद्रे, संतोष शिंदे, प्रदीप घोरडे, राहुल नागरगोजे, अंगद कोतवाड, नामदेव चेवले, महबूब सय्यद, भीमाशंकर फुलारी, अभिजीत लोखंडे, राम बनसोडे, निजामुद्दीन मोमीन, तुकाराम कज्जेवाड, अर्जुन तिडोळे, जुल्फेकार लष्करे, संतोष देवडे, गणेश साठे यांनी केली आहे.



