दिल्लीचे तख्त हादरवणारा मराठी बाणा!
२०११ च्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून ते २०२६ च्या अभिजीत दिपकेपर्यंतचा रोमहर्षक प्रवास

नवी दिल्ली: देशाच्या सर्वोच्च सत्ताकारणात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांना संधी मिळूनही पंतप्रधानपदाची खुर्ची गाठता आली नाही, त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात मराठी नेतृत्वाचा प्रभाव ओसरल्याची चर्चा कायम रंगत असते. परंतु, प्रत्यक्ष राजकीय पटलावर वजन काहीसे कमी झाले तरी, जनआंदोलने आणि समाजकारणाच्या जोरावर मराठी माणसाने पुन्हा एकदा आपली अफाट ताकद संपूर्ण देशासमोर सिद्ध केली आहे. गेल्या १५ वर्षांच्या कालखंडात एक-दोनदा नव्हे, तर दोन वेळा मराठी बाण्याने दिल्लीचे राजकीय तख्त हादरवून सोडले. २०११ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पेटवलेलाण वणवा असो वा आता नव्या दमाचा तरुण अभिजीत दिपके याने उभा केलेला लढा; मराठी माणसाची आक्रमक ताकद देशाला पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली आहे.
इतिहास काय सांगतो? (अण्णा हजारे ते अभिजीत दिपके): आपल्या हिमतीच्या जोरावर दिल्लीचे रक्षण करण्यात मराठी माणूस नेहमीच पुढारलेला राहिला आहे, पण जेव्हा अन्यायाविरुद्ध वेळ येते, तेव्हा तेच तख्त उलटवून टाकण्याची ताकदही आपल्यात असते, याचा पुनरुच्चार झाला आहे. २०११ मध्ये अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात उभारलेल्या ऐतिहासिक आंदोलनाने तत्कालीन यूपीए सरकारची पायाळू हलवली होती. त्या जनक्षोभातूनच देशात एक नवा राजकीय पर्याय जन्माला आला आणि २०१४ च्या महासत्तेत बदल घडला. आता २०२६ मध्ये मराठमोळ्या अभिजीत दिपके या तरुणाने पुकारलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनामुळे थेट केंद्रीय मंत्र्याला राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली. गेल्या १२ वर्षांच्या मोदी सरकारच्या कार्यकाळात अनेक मोठी आंदोलने झाली, पण एकाही आंदोलनामुळे मंत्र्याला खुर्ची सोडावी लागली नव्हती; हा अभूतपूर्व चमत्कार एका मराठी तरुणाने करून दाखवला.
कोण आहेत अभिजीत दिपके? मूळ मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी हे त्यांचे मूळ गाव. वडिलांच्या शासकीय नोकरीमुळे त्यांचे बालपण व शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे गेले. त्यांनी पुण्यामधून पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेतले आणि त्यानंतर थेट अमेरिकेतील प्रतिष्ठित बोस्टन विद्यापीठातून पब्लिक रिलेशन्समध्ये एम.एस्सी. ची पदवी संपादन केली. २०२० ते २०२२ या कालावधीत त्यांनी ‘आम आदमी पार्टी’च्या सोशल मीडिया विभागात प्रमुख स्वयंसेवक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत गाजलेले अनेक राजकीय मीम्स आणि त्यांची कल्पकता अभिजीतचीच होती.
‘कॉकरोच जनता पार्टी’ स्थापनेची रंजक पार्श्वभूमी: ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या अनोख्या पक्षाच्या जन्मामागे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे एक वक्तव्य कारणीभूत ठरले. १५ मे २०२६ रोजी बोगस पदव्यांच्या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही बेरोजगार तरुण हे झुरळांसारखे (कॉकरोच) असतात, जे सोशल मीडिया आणि आरटीआयच्या माध्यमातून यंत्रणेला ट्रोल करतात, अशी टिप्पणी केली होती. या उपरोधिक विधानाला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी १६ मे रोजी अभिजीत दिपकेने ‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना केली. सोशल मीडियावर पक्षाची घोषणा करताच काही दिवसांतच सीजेपीचे डिजिटल फॉलोअर्स देशातील भाजप आणि काँग्रेससारख्या बलाढ्य पक्षांच्या पुढे निघून गेले.
जंतर-मंतर ते संसदेची धडक आणि ऐतिहासिक यश: नीट परीक्षांमधील पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत २८ जून रोजी प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी सीजेपीच्या बॅननरखाली जंतरमंतरवर उपोषण छेडले. २० व्या दिवशी, म्हणजेच १८ जुलै रोजी पोलिसांनी बळाचा वापर करून हे उपोषण मोडून काढले आणि वांगचुक यांना रुग्णालयात हलवले. या दडपशाहीने संतापलेल्या अभिजीत दिपकेने आंदोलनाची सूत्रे स्वतःकडे घेत २० जुलै रोजी संसदेवर धडक देण्याची हाक दिली. पोलिसांच्या लाठीचार्जमुळे हा वनवा अधिकच भडकला. देशातील तरुणाईने इन्स्टाग्राम, रील्स आणि डिजिटल माध्यमांच्या अचूक वापराने मुंबई, पुणे, पाटण्यासह संपूर्ण देशात आंदोलनाची आग पसरवली. या तुफान जनआक्रोशापुढे अखेर केंद्र सरकारला घुटना टेकवावा लागला आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपला राजीनामा द्यावा लागला. या संपूर्ण ऐतिहासिक संघर्षात मराठमोळ्या अभिजीत दिपकेचे नेतृत्व सर्वात मोठे टर्निंग पॉइंट ठरले.



