मिरजेतील गणेश तलावातील पाणी प्रदूषित झाल्यामुळे मृत माशांचा खच
गणेश तलावमध्ये निर्माल्य किंवा कचरा टाकल्यास महापालिका उपायुक्त विजया यादव यांनी दिला कडक कारवाई इशारा.

सांगली प्रतिनिधी : मिरजेतील गणेश तलावमध्ये पाणी प्रदूषणामुळे झाल्याने दोन दिवसात सुमारे ६०० किलो मासे मृत झाल्याचे समोर आले आहे. मात्र याचे नेमके कारण शोधण्यासाठी आता पाणी तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहे. तर या घटनेनंतर गणेश तलावमध्ये निर्माल्य आणि कचरा टाकल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला. सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या गणेश तलावमध्ये कोणत्या तरी अज्ञात कारणावरून मागील दोन दिवसापासून मासे मृत होत आहेत. तलावातील पाणी प्रदूषित झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन दिवसात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गणेश तलावमध्ये स्वच्छता मोहीम राबवून सुमारे ६०० किलो पेक्षा जास्त मृत मासे बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावली आहे. पाणी प्रदूषित झाल्यामुळे मासे मृत झाल्याचे बोलले जात आहे.
गणेश तलावमध्ये कचरा, धार्मिक विधीचे निर्माल्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात टाकले जात असल्याने तलावातील जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. सांगली महापालिका आरोग्य विभागाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. तसेच यापुढे पाण्याचे प्रदूषण करणाऱ्यावर कारवाईचा इशारा महापालिकेच्या उपायुक्त विजया यादव यांनी दिला.
कचरा टाकण्यासाठी नागरिकांनी निर्माल्य कुंडाचा वापर करावा; अशी कित्येक वेळा महापालिका प्रशासनाकडून सूचना दिल्या आहेत. तरी देखील गणेश तलावमध्ये कचरा टाकला जातो. तलाव परिसरातील खाऊंच्या गाड्या ही गणेश तलाव प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन ॲक्शन मूडमध्ये आले असून गणेश तलावमध्ये कचरा अथवा निर्माल्य टाकल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त विजया यादव यांनी दिला आहे.



