निलंग्याच्या केळगावात जुन्या वादातून भररस्त्यात कोयत्याने जीवघेणा हल्ला
तीन जण जखमी ; तिघांना अटक

विशेष प्रतिनिधी / महाराष्ट्र मिशन
लातूर : निलंगा तालुक्यातील मौजे केळगाव (जि. लातूर) येथे मागील वादातून भररस्त्यात कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला. या थरारक प्रकारात तीन जण गंभीर जखमी झाले असून आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा निलंगा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून संबंधित आरोपींना अटक केली आहे.
ही घटना दि. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता मुगळे यांच्या किराणा दुकानासमोर घडली. विशाल बालाजी कांबळे (वय २५, रा. केळगाव) यांच्याशी झालेल्या पूर्वीच्या वादाच्या कारणावरून आरोपी सागर सत्यवान सूर्यवंशी याने कोयता घेऊन धमकी देत हल्ला केला. विशाल कांबळे यांच्या डोक्यावर, डाव्या हातावर, डाव्या खुब्यावर आणि उजव्या मनगटावर जोरदार वार करण्यात आले. यात ते गंभीर जखमी झाले.
हल्ला थांबविण्यासाठी धावून आलेले त्यांचे वडील बालाजी श्रीपती कांबळे (वय ५०) यांनाही मारहाण करण्यात आली. त्यांच्या डाव्या कानावर, डाव्या पायाच्या पिंढरीवर आणि उजव्या मांडीवर वार करून गंभीर दुखापत करण्यात आली. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या उद्धव राम कांबळे (वय ३०) यांनाही सुजित दत्तू हरणे याने कोयत्याने मांडीवर वार करून जखमी केले. या प्रकरणी सागर सत्यवान सूर्यवंशी
निवृत्ती शिवाजी सूर्यवंशी (दोघे रा. केळगाव) आणि सुजित दत्तू हरणे (रा. दत्तनगर, निलंगा) यांच्याविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ११८(२), ११८(१), ११५ (२), ३५२, ३(५) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम ४/२५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १ दाखल करण्यात आला आहे.



