महाराष्ट्र

जनतेची लूट करण्याऐवजी सरकारने गॅस दरवाढ तात्काळ रद्द करावी

प्रदेश काँग्रेस कमिटीची मागणी 

मुंबई : एलपीजी गॅस ६० रुपयांनी महाग करून भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खोल दरीत लोटले आहे. केंद्रातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही दरवाढ झालेली आहे. युद्धाचे कारण पुढे करून जनतेची लूट करण्याऐवजी सरकारने ही दरवाढ तात्काळ रद्द करावी तसेच एलपीजी गॅस संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व घटकांशी चर्चा करून संसदेत निवेदन करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

गॅस दरवाढ व टंचाई विरोधात काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलन करून भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, संदीप पाटील प्रकाश सोनावणे, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड, नाशिक उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश कहांडाळ, नाशिक दक्षिण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भारत टाकेकर, प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदशाध्यक्ष म्हणाले की, देशातून गॅस सिलेंडर गायब आहे तर संसदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी गायब आहेत. नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्पसमोर सरेंडर झाले आहेत, त्याची मोठी किंमत सामान्य माणसाला मोजावी लागत आहे. घरातून गॅस गायब आहे तर व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने छोटे व्यवसाय, हॉटेल्स, खाणावळी बंद कराव्या लागत आहेत. राज्यातील भाजपा महायुती सरकार लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिल्याचा ढोल पिटत असते पण दुसरीकडे मात्र महागाई करून या लाडक्या बहिणींटी लुट करत आहे असे काँग्रेस प्रदेशाध्य़क्ष म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी गॅस वितरकाच्या कार्यालयात जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली तसेच गॅस सिलेंडर घेण्यासाठी आलेल्या महिलांशी संवाद साधून गॅस टंचाईबद्दल त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेतले. गॅस दरवाढीवर महिला संतप्त असून भाजपा सरकारने जगणे महाग केले आहे, अशा भावना महिलांनी बोलून दाखवल्या. नागपूर, पुणे, ठाणे, वर्धा, बुलढाणा, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, पालघर, भिवंडी, कल्याण डोंबिवली, धाराशिव, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, ठाणे, पनवेल सह सर्व जिल्ह्यात गॅस दरवाढ व टंचाईविरोधात आंदोलन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page