राजकारणापेक्षा माणुसकी, संवेदनशीलता महत्त्वाची; गणेश बिडकर यांचे वक्तव्य

पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या निवडीनंतर कोणताही आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतला आहे.
राजकारणापेक्षा माणुसकी, संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्ये अधिक महत्त्वाची आहेत, अशी माहिती गटनेते गणेश बिडकर यांनी दिली.
महापौर व उपमहापौर पदाची निवड ९ फेब्रुवारी रोजी होत आहे. महापालिकेत भारतीय जनता पार्टीकडे ११९ नगरसेवकांचे स्पष्ट संख्याबळ असल्याने ही निवड प्रक्रिया केवळ औपचारिक स्वरूपाची असली, तरी विवेक म्हणून जल्लोष केला जाणार नाही.
पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, या दुःखद प्रसंगी पक्षातील सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांमधून महापौर व उपमहापौर निवडीनंतर गुलाल, फुले, फटाके अथवा कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता अत्यंत साध्या पद्धतीने निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
निवडीनंतर केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच पहिल्याच मुख्य सभेत स्व. अजितदादा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सर्वपक्षीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन बिडकर यांनी केले.
यासंदर्भात गणेश बिडकर म्हणाले, “माझ्यासह पुणे महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी दादांसोबत प्रत्यक्ष काम केले आहे. पुणे शहराच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. महापालिकेच्या पहिल्याच मुख्यसभेत त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे.



