महाराष्ट्र

शत्रूशी लढताना महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांचे बलिदान; उरी सेक्टरमध्ये अर्जुन जाधव आणि विक्रम चव्हाण शहीद

कराड/शाहूवाडी : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) कर्तव्य बजावताना झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण आले आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर येथील अर्जुन राजेंद्र जाधव (३०) आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली येथील विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे दोघे जण शहीद झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

मंगळवारी सायंकाळी उरीमधील कमलकोट परिसरात भारतीय लष्कराचे जवान नियमित गस्त घालत होते. याच दरम्यान अचानक झालेल्या भीषण हँड ग्रेनेड स्फोटात अर्जुन जाधव आणि विक्रम चव्हाण हे दोघे गंभीर जखमी झाले. सहकाऱ्यांनी तातडीने बचावकार्य करत दोन्ही जवानांना हेलिकॉप्टरद्वारे श्रीनगरमधील बदामीबाग येथील ९२ बेस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी दोघांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान दुर्दैवाने दोघांचीही प्राणज्योत मालवली.

शूर सुपुत्रांची शौर्यगाथा

शहीद अर्जुन जाधव हे भारतीय लष्कराच्या ‘बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप’मध्ये कार्यरत होते. गेल्या नऊ वर्षांपासून ते देशसेवा करत होते आणि सध्या त्यांची नियुक्ती ८ राष्ट्रीय रायफल्स (RR) युनिटमध्ये होती. अर्जुन जाधव हे आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त लवकरच सुट्टी घेऊन घरी येणार होते, मात्र त्यापूर्वीच नियतीने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, अकरा महिन्यांचा मुलगा, दोन बहिणी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेला धाकटा भाऊ असा परिवार आहे. दुसरीकडे, विक्रम चव्हाण हे देखील एक कर्तव्यदक्ष आणि धाडसी जवान म्हणून ओळखले जात होते.

गावी पोहोचणार पार्थिव

शहीद जवानांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले असून, शुक्रवारी सकाळी ते त्यांच्या मूळ गावी (शहापूर आणि गोंडोली) पोहोचणार आहे. त्यानंतर शासकीय आणि लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार कल्पना ढवळे यांनी शहापूर येथे जाऊन शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या दोन्ही वीरपुत्रांना संपूर्ण महाराष्ट्र भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे. या स्फोटाचे नेमके कारण काय होते, याचा तपास सध्या लष्कराकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page