
मुंबई/पुणे : भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्राच्या काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १ मार्च ते २० एप्रिल दरम्यान उष्माघाताची ३९ प्रकरणे नोंदवली आहेत. सोलापूरमध्ये उष्माघातामुळे एका मृत्यूचीही शक्यता व्यक्त होत आहे.
भारतीय हवामान विभागाने काही विशिष्ट भागांमध्ये पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. पुढील दोन दिवसांत, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोकण पट्ट्यात उष्णतेची लाट आणि पाऊस दोन्ही एकाच वेळी अनुभवाला येण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, चक्रीवादळी वाऱ्यांमुळे राज्यात दाबात बदल झाला आहे, ज्याचा परिणाम विशेषतः कोकण किनारपट्टीवर होईल. मुंबई आणि आसपासच्या किनारपट्टी भागातील तापमान आधीच ४१ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले असून, पुढील काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यभरातील वाढत्या तापमानामुळे आरोग्याविषयी चिंता वाढली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ४० ते ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
अधिकाऱ्यांनी नागरिकांना, विशेषतः दुपारच्या वेळी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि गर्भवती महिलांना थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांनी तीव्र उष्णतेच्या परिस्थितीत शरीरात पाण्याची पातळी टिकवून ठेवण्याचे आणि घराबाहेरील हालचाली मर्यादित ठेवण्याचे महत्त्वही अधोरेखित केले आहे.
२९ एप्रिल ते १२ मे दरम्यान राज्यात हाय अलर्ट
विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये २९ एप्रिल ते १२ मे दरम्यान, सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत कोणत्याही व्यक्तीने उन्हात बाहेर जाऊ नये, कारण हवामान विभागाने सांगितले आहे की तापमान ४५ अंश सेल्सिअस ते ५५ अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते. विशेषतः सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान थेट सूर्यप्रकाश टाळावा. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी कारण अनेकांना ही माहिती पहिल्यांदाच मिळत असेल, असे आवाहन नागरिक संरक्षण महासंचालनालयाने केले आहे.
जर कोणाला घुसमटल्यासारखे वाटले किंवा अचानक तब्येत बिघडली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरातील दरवाजे उघडे ठेवावेत जेणेकरून वायुवीजन होईल. मोबाईलचा वापर कमी करावा, मोबाईल फुटण्याची शक्यता असू शकते. शक्यतो दही, ताक, बेलफळाचा रस इत्यादी थंड पेयांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिक संरक्षण महासंचालनालयाने नागरिकांना आणि रहिवाशांना पुढील बाबींविषयी इशारा दिला आहे. ४७ अंश सेल्सिअस ते ५५ अंश सेल्सिअस दरम्यान वाढणारे तापमान आणि पुढील काही दिवसांत क्युम्युलस ढगांच्या उपस्थितीमुळे बहुतांश भागात उष्ण व दमट वातावरण निर्माण होईल.
पुरेसे पाणी आणि द्रवपदार्थ प्यावेत. गॅस सिलिंडर उन्हात ठेवू नये. वीजमीटरवर जास्त भार टाकू नये. घरातील वापरात असलेल्या भागातच एसी वापरावा, दोन ते तीन तासांनी ३० मिनिटे विश्रांती घ्या. बाहेर तापमान ४५–४७ अंश सेल्सिअस असताना घरातील एसी २४–२५ अंश सेल्सिअस वर ठेवावा, त्यामुळे आरोग्य चांगले राहील, असे सुचवण्यात आले आहे.
विंचू आणि साप यांच्यापासून सावध रहावे, कारण ते त्यांच्या बिळातून बाहेर येऊन थंड जागा शोधण्यासाठी बागेत किंवा घरात येऊ शकतात,अशी सूचना देण्यात आली आहे.
सुरक्षेच्या उपाययोजना
तहान लागलेली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस (ORS), लस्सी, लिंबू पाणी, ताक आणि कैरीचे पन्हे यांसारख्या घरगुती पेयांचा वापर करावा.
बाहेर पडताना हलके, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा ओल्या कापडाचा वापर करावा. दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. कष्टाची कामे पहाटेच्या वेळी उरकून घ्यावीत आणि कामाच्या ठिकाणी मध्ये-मध्ये विश्रांती घ्यावी.घर थंड ठेवण्यासाठी पडदे आणि सनशेडचा वापर करावा. रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पाळीव प्राणी आणि गुरांना छावणीत ठेवावे व त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे.
चक्कर येणे, सतत घाम येणे, डोकेदुखी किंवा अशक्तपणा जाणवल्यास ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. अशा वेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सावधगिरीच्या सूचना
चहा, कॉफी, दारू आणि कार्बोनेटेड थंड पेये घेणे टाळावे, कारण यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या पार्क केलेल्या वाहनात सोडू नका. तापमान जास्त असताना कष्टाची कामे टाळावीत. उन्हाच्या तीव्र कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे आणि स्वयंपाकघरात हवेशीर वातावरण ठेवावे.



