गुन्हेगारीपुणे शहर

पोर्शे कार अपघात प्रकरणातील तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 

पुणे : २०२४ च्या पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने बदलण्याच्या षड्यंत्रात सहभागी असलेल्या तीन आरोपींना सुप्रीम कोर्टाने सोमवार २ फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर केला आहे. इंदिरा नगरमध्ये झालेल्या या हाय-प्रोफाईल अपघातात दुचाकीस्वार संगणक अभियंता अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले होते.

‘लाइव्ह लॉ’च्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयन यांच्या खंडपीठाने आरोपींची १८ महिन्यांहून अधिक काळाची कोठडी लक्षात घेत ही दिलासा देणारी भूमिका घेतली. या प्रकरणातील आरोपी आशिष सतीश मित्तल, आदित्य अविनाश सूद आणि अमर संतोष गायकवाड यांना ट्रायल कोर्टाने ठरवलेल्या अटींवर जामीन देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्यावर गाडीतील दोन अल्पवयीन मुलांचे (आरोपी अल्पवयीन चालकाव्यतिरिक्त) रक्ताचे नमुने स्वतःच्या रक्ताच्या नमुन्यांशी बदलल्याचा (मद्यप्राशन केल्याचे लपवण्यासाठी) आरोप आहे. आशिष सतीश मित्तल हे अपघातातील एका अल्पवयीन मुलाच्या वडिलांचे मित्र आहेत, तर आदित्य सूद हे त्याच मुलाचे वडील आहेत (मागील सीटवर बसलेला). अमर गायकवाड हे मध्यस्थ होते. अमर गायकवाडने रक्तनमुने बदलण्यासाठी ३ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. आयपीसीच्या विविध कलमांखाली तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. यामध्ये बनावट कागदपत्रे, पुरावे नष्ट करणे आणि लाच देणे यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page