आरटीई प्रवेशासाठी पालकांना मोठा दिलासा; प्रवेश प्रक्रियेला १९ जूनपर्यंत मुदतवाढ

मुंबई: राज्यातील शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) इयत्ता पहिलीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी आता १९ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी याबाबत अधिकृत सूचना जारी केल्या असून, ही मुदतवाढ अंतिम असल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर पुन्हा कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही विभागाने नमूद केले आहे.
राज्यातील ८,७०१ खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत १ लाख १४ हजार ८२६ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी तब्बल २ लाख ८९ हजार २८६ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत अपेक्षेपेक्षा कमी प्रवेश झाल्याने शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. पहिल्या फेरीत २०,७९६ विद्यार्थ्यांची निवड झाली होती, त्यापैकी १२,९३९ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले.
दुसऱ्या फेरीत ५,७०४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती, मात्र १३ जूनपर्यंत केवळ २,८५७ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. पहिल्या फेरीच्या तुलनेत दुसऱ्या फेरीत अर्जांची निवड आणि प्रवेशाचा वेग कमी असल्याचे दिसून येत असल्याने, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.



