महाराष्ट्र दिनानिमित्त साताऱ्यात मुख्य शासकीय ध्वजवंदन संपन्न

सातारा : स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण आणि स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्यासारख्या थोर सुपुत्रांनी महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीचा पाया रचला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत सातारा जिल्ह्याला राज्याच्या नकाशावर पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा सकुल येथे महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानमित्त राष्ट्रध्वजवंदन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकड, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१९६० साली महाराष्ट्राचा ‘मंगल कलश’ आणणाऱ्या यशवंतरावजी चव्हाण आणि जडणघडणीत योगदान देणाऱ्या सर्व थोर व्यक्तींचे कृतज्ञता पूर्वक स्मारक करून ते म्हणाले, राज्याने परकीय गुंतवणुकीचे मोठे उद्दिष्ट ठेवले असून, दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्राने सर्वाधिक सामंजस्य करार करून देशात आपले अग्रस्थान टिकवून ठेवले. इंच न् इंच जमीन ओलिताखाली आणणे हे शासनाचे ध्येय असून, अपूर्ण राहिलेले जलप्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य दिले जात आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे.
सातारा जिल्ह्याने राबविलेल्या ‘मॉडेल स्कूल’ आणि ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या योजनांचे सादरीकरण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर झाले, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्हा नियोजन समिती आणि सीएसआर निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हातात हात घालून काम करत असून, या विकासयात्रेत जिल्हावासियांनी साथ द्यावी.



