भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचारानंतर हत्या६० वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुणे : उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आलेल्या एका ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली. ही संतापजनक घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापुर गावात घडली. शुक्रवारच्या दुपारी नसरापूर राम मंदिर परिसरात खेळत होती. त्यावेळी नराधमाने तिला आमिष दाखवून तेथून जवळच असलेल्या एक गुरांच्या गोठ्यात नेऊन निर्दयीपणे अत्याचार केला, त्यानंतर तिचा खून केला. बुध्द पौर्णिमेच्या दिवशी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना झाली.
आरोपी ६० वर्षीय असल्याचे समजते. आरोपीने याआधी देखील एका महिलेवर बलात्कार केला होता अशी माहिती स्थानिक देत आहेत. या घटनेनंतर नागरिक सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत.
बऱ्याच वेळा झाला तरी मुलगी घरी आली नसल्याने चिमुरडीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुलगी सापडत नाही म्हणून कुटुंबीयांनी व परिसरातील नागरिकांनी तिचा शोध घेतला. परंतु मुलगी सापडत नसल्याने कुटुंबीयांनी परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यात चिमुरडी मुलगी एका व्यक्ती सोबत गोठ्यात जाताना दिसली, यावरून त्या भागात कुटुंबियांनी शोध घेतला. त्यावेळी त्यांना गोठ्यामध्ये झाकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला.
यावरून नागरिकांनी ज्या व्यक्ती बरोबर ती गेली होती, त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. गावाच्या परिसरात आरोपी भिमाजी कांबळे याचा शोध घेण्यात आला. तो गावच्या नदीकडील भागात सापडला त्याला पकडण्यात आले आहे. त्याला पकडून आणल्यानंतर मुलगी कुठे आहे तू काय केले, असे विचारले असता त्याने मी काही केले नाही? असे उत्तर दिले.
दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सदर व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. या संतापजनक घटनेमुळे समस्त नसरापूर मधील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. त्यांनी मृतदेह हलवण्यास नकार देऊन सदर नराधमास ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावे आम्ही त्याला शिक्षा देऊ अशी मागणी करत पोलिसांना अडवून धरले आहे.
गावात कडकडीत बंद
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर शनिवारी गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.
ज्या राज्याचा अभिमानाने वर्धापन दिन साजरा करतो त्याच राज्यात गोठ्यातील वासरू दाखवतो सांगत बलात्कार आणि खून होतो ही प्रत्येक माणसाला लज्जास्पद गोष्ट आहे, असे मुकुंद किर्दत (आप पालक युनियन, प्रवक्ते आम आदमी पार्टी महाराष्ट्र) यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की प्रत्येक घरातील मुलांच्या आयुष्यात काय वाढून ठेवले आहे या सततच्या भीतीने पालक अस्वस्थ आहेत. रस्त्यावर भीती, वाहनात भीती, शाळेत भीती, मुतारीमध्ये भीती, शेतात भीती, पार्टीत भीती, बस स्टँड वर, रेल्वेत भीती काही संपत नाही..पालक मुलांना एकटे सोडताना गुदमरतो आहे.
अपुरी सुरक्षा, वाईट प्रवृत्तीवर पोलिसांचा आणि समाजाचाही वचक नसणे, तपासात न्याय मिळण्यात दिरंगाई, लोकप्रतिनिधी विषयी अविश्वास यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ आहे. बहिणींच्या डोक्यावर संकटाची टांगती तलवार आहे. लैंगिक सुख, पुरुषत्व, नशा याच्या नवनवीन हिंसक कल्पनांमुळे तरुणाई वहावत जाताना युती सरकार, पोलिस यंत्रणा ढिम्म आहे हे दुर्दैवी आहे.



