नीट पेपरफुटीवरून आठवलेंचा विरोधकांवर निशाणा; शरद पवारांना दिली एनडीएत येण्याची ऑफर

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर भाष्य करताना विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. देशात ‘कॉक्रोच जनता पक्षा’ची कोणतीही आवश्यकता नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पेपरफुटीच्या प्रकरणावर बोलताना आठवले म्हणाले की, विविध राज्यांत दोषींवर कारवाई सुरू असून केवळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे विरोधकांनी गोंधळ न घालता भविष्यात असे गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारला विधायक सूचना कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याचवेळी शरद पवारांबाबत बोलताना आठवले यांनी त्यांना काँग्रेसपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. शरद पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये, कारण काँग्रेसला भविष्यात फारसे वाव नाही, असे आठवले म्हणाले. त्याऐवजी शरद पवारांनी एनडीएत यावे किंवा जर त्यांना भाजपसोबत जाणे शक्य नसेल, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत (RPI) सहभागी व्हावे, अशी खुली ऑफर त्यांनी पवारांना दिली. अजित पवार एनडीएमध्ये आहेत, तसे शरद पवारही आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागतच असेल, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.



